मी लहानपणापासून पुण्यात नेहमी येत आहे. पुणे बदलले आहे. आता पुण्यात खूप समस्या दिसून येत आहेत. जर राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो, असं सूचक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केलेले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अमित ठाकरे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढत आहेत. दरम्यान पत्रकारांशी त्यांना अनौपचारिक संवाद साधला. त्यामध्ये अमित ठाकरे म्हणाले, “पुणे बदललं आहे, त्यात आता खूप समस्या दिसून येत आहेत. जर पुणे लोकसभेची निवडणूक लढविण्याचा आदेश राजसाहेबांनी दिला तर मी ही निवडणूक लढवू शकतो”, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनविसेचे गजानन काळे, प्रशांत कनोजिया उपस्थित होते.
सध्या पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात मनसेचे नेते वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बोलताना अमित ठाकरे म्हणाले की,“राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणे काय बीडमध्येही मी लोकसभेची निवडणूक लढवू शकतो. मात्र, मी स्वत:हून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अद्याप विचार केलेला नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमित ठाकरे म्हणाले, “दोन पक्षांचे चार गट झाले आहेत. नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सूत्रे हातात घेऊन, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही. राहायला वसतिगृह नाहीत. अनेक वर्षांपासून मराठी भाषा भवनाचे काम अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय कारकिर्दीतील पहिला गुन्हा पुण्यात अंगावर घेण्याची तयारी आहे. आगामी काळात मनविसेने प्रत्येक विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढवण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चे काढण्यासाठी तयार आहे.”
हेही वाचा : Manohar Joshi : भिक्षुकी करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा संघर्षमय प्रवास