टीम लय भारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांचे कान टोचल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्यपालांनी आपल्या एक वर्षाच्या कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना अभिप्रायासाठी पाठवले आहे. या पुस्तकाला अभिप्राय देताना पवारांनी खरमरीत पत्र लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे शरद पवार यांनी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख करत लिहिलेल्या पत्रासंबंधीही यात टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले, याबद्दल धन्यवाद. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपददस्थ गाठीभेटी, सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत’.
‘तसेच निधर्म वादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही,’ अशी आठवण करुन देत शरद पवारांनी एका अर्थी कोश्यारी यांचे कान टोचले आहे.