लयभारी न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेतील मानखुर्दमधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. तर शिवसेनेचा जुना मित्रपक्ष भाजपही मैदानात असल्यामुळे ही लढत तिरंगी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक 141 मधील पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारराजा मतदान करण्यासाठी घराबाहेर पडला. शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे, भाजपकडून दिनेश (बबलू) पांचाळ तर काँग्रेसकडून अल्ताफ काझी रिंगणात आहेत. एकूण 18 उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.
मानखुर्द प्रभागात एकूण 32 हजार मतदार असून काहींची नावे मतदार यादीत आलेली नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विठ्ठल लोकरे हे आधी काँग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीत ते अबू आझमींविरोधात उभे होते. पराभव झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि ते शिसेनेत गेले. मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 च्या पोटनिवडणुकीत आता ते पुन्हा नशीब आजमावणार आहेत.
एकीकडे महाविकास आघाडी असून दुसरीकडे याच भागात काँग्रेसचे उमेदवार अल्ताफ काझीही उभे आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.