४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्य शासनाने आणि दहा वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या समाजाेपयाेगी कामांची पावती आम्हाला मतदार राजा या नवडणुकीतून देईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या दिंडोरी लाेकसभेच्या उमेदवार डाॅ. भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गाेडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde) काल (दि. २) नाशिकमध्ये आले हाेते. त्याप्रसंगी बाेलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.(Dr. Pawar, Godse’s victory is certain: Shinde)
ते पुढे म्हणाले की, नाशिकची उमेदवारी जाहीर हाेण्यास उशीर लागल्याने प्रचाराला कमी वेळ मिळेल, अशी चर्चा विराेधक करत असले तरी आम्ही केवळ निवडणुकीपुरते काम करत नाही, तर आम्ही बारा महिने चाेवीस तास जनसेवेची कामे करत असताे. त्यामुळे आमची नेहमीच निवडणुकीची तयारी असते. निवडणुका आल्या की बाहेर पडायचे अन इतर वेळी फेसबुक लाईव्ह करायचे, ही आमची कामाची पद्धत नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टाेला लगावला. राेज सकाळी उठायचे अन शिव्या शाप द्यायचे, यापलिकडे विराेधकांना आता काहीही काम उरलेले नाही. आणि या निवडणुकीनंतर तर त्यांना तेही काम उरणार नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.