टीम लय भारी
मुंबई : सुरू होण्यापूर्वीच बंद झालेले एसटी पोर्टल (ST Portal) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी चुकीची माहिती ( Free travel in ST ) दिल्यामुळे हजारो विद्यार्थी, पर्यटक आणि गावी निघालेल्या मुंबईकर चाकरमान्यांना सोमवारी नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी चुकीची माहिती दिल्यामुळेच अनेक ठिकाणी गर्दी पसरल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. चुकीची माहिती दिली आणि वांद्रे स्थानकात गर्दी झाली म्हणून ‘एबीपी माझा’चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना सरकारने अटक केली. आता चुकीची माहिती दिली म्हणून एस. टी. स्थानकांमध्ये (Rush in ST Depot) गर्दी झाली. ही माहिती देणारे मंत्री अनिल परब यांना अटक होणार का? असा सवालही नितेश राणे यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.
चुकीची माहिती दिली आणि वांद्रे ला गर्दी झाली म्हणून @abpmajhatv चे राहुल कुलकर्णी ला महाराष्ट्र सरकारने अटक केली.
आज चुकीची माहिती दिली म्हणून ST डेपो च्या बाहेर गर्दी झाली..
मग ही माहिती देणारे मंत्री अनिल परब ना उद्या पहाटे अटक होणार का?
उद्या सकाळीची मी वाट पाहतोय..— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2020
आधीच लॉकडाऊन (Lockdown) त्यातच आंतरजिल्हा प्रवासबंदी, अशा निर्णयसंभ्रमामुळे जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट एसटी स्थानक-आगारांकडे धाव घेतली. विद्यार्थी-एसटी अधिकारी यांचा संघर्ष शिगेला पोहचताच पोलिसांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांची समजूत काढली. एकूणच या गोंधळसत्रानंतर घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तूर्तास वाटच पाहावी लागणार आहे.
कामगार, मजुरांबरोबरच अन्य नागरिकांसाठी राज्यांतर्गत सोमवारपासून एसटीची मोफत सेवा देण्याबाबत शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणेमुळे सोमवारी राज्यातील बहुतांश एसटी आगारांमध्ये गावाची ओढ लागलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली. काही ठिकाणी गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनाही पाचारण करावे लागले.
या च्या मुळे गोंधळ झाला👇 pic.twitter.com/EZRUcWYerf
— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2020
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी राज्यांतर्गत आणि परराज्यातून राज्यात येऊ इच्छिणा-या व जाणा-या मजूर, कामगार, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास देण्याची घोषणा शनिवारी केली होती. मात्र त्याच रात्री मदत व पुनर्वसन विभागाने आदेशात बदल केला. इतर राज्यातील अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यात अडकलेले जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत, त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच एसटीची मोफत बस सेवा उपलब्ध करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु, याची कल्पना अन्य प्रवाशांना नव्हती. सोमवारपासून मोफत प्रवास सेवा उपलब्ध होणार असल्याने एसटी आगारांबाहेरच एकच गर्दी झाली. मुंबई सेन्ट्रल आगार, परळ, बोरिवली, कुर्ला नेहरू नगर, ठाणे खोपट, पनवेल, नालासोपारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली, नाशिक यासह राज्यातील अनेक एसटी आगारांच्या मुख्य प्रवेशद्वारांवरच चौकशीसाठी प्रवाशांची झुंबड उडाली. गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करावे लागले.
बोरिवली स्थानकात प्रवासी-अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. मुंबई सेंट्रल मुख्यालयात झालेली गर्दी पांगवण्यासाठी थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पातळीवर बदलणा-या निर्णयांमुळे आगारातील अधिकारी वर्गाला गर्दीच्या प्रश्नांना तोंड देणे जमले नाही. अखेर मुंबई सेंट्रल आगार व्यवस्थापकांनी, १७ मे पर्यंत आंतरजिल्हा प्रवास बंद आहे. केवळ अन्य राज्यांतील श्रमिकांनाच एसटीतून मोफत प्रवासाची मुभा आहे, असे फलक झळकवले.
चालत आपल्या मूळ गावी निघालेल्या अन्य राज्यांतील श्रमिकांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत मोफत सोडण्याचे काम एसटीतर्फे सुरू आहे. मात्र एसटी पोर्टल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत आंतरजिल्हा वाहतूक बंद करण्यात आली, असे महामंडळातील वाहतूक विभागातील अधिका-यांनी सांगितले. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्षांनी याला दुजोरा दिला आहे.