देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी २६/ ११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार आणि जेष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “माजी आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या (shot by terrorist) (कसाब) बंदुकीतील नव्हती तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती.(Hemant Karkare shot by terrorist, Ujjwal Nikam…”; Vijay Wadettiwar’s serious allegations)
त्यावेळी हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले. त्यामुळे खरे देशद्रोही हे उज्ज्वल निकम आहेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. तसेच या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार यांनी “आपण हे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे,” असे म्हटले आहे. त्यामुळे आता या विधानावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, वडेट्टीवार यांनी मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत पुढे म्हटले की, मी काहीही म्हटले नसून त्यावेळी विलासराव देशमुख म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत उज्वल निकम यांना काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी तो करावा”, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यामुळे आता यावर उज्ज्वल निकम काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच या विधानावरून भाजपच्या नेत्यांनीही वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.