27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeराजकीयMaharashtra Assembly Session : 'ही स्मार्ट सिटी नव्हे तर भ्रष्ट सिटी योजना'

Maharashtra Assembly Session : ‘ही स्मार्ट सिटी नव्हे तर भ्रष्ट सिटी योजना’

पुणे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. यावेळी पुरवणी मागण्यांच्या या जाडजूड पुस्तकात आपल्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा नसल्याचे म्हणत दुःख व्यक्त केले आहे.

राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आजच्या चौथ्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी विरोधकांनी निधीअभावी मतदारसंघात रखडलेल्या समस्यांचा गळा काढला तर राज्यात नव्या योजनांच्या माध्यमातून शिंदे – फडणवीस सरकार ‘अच्छे दिन’ आणणार असा सत्ताधाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्यान पुण्यातील हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे (chetan Tupe) यांनी पुण्यात नेमकं काय चाललंय आणि स्मार्ट सिटी योजना कशी भ्रष्ट योजना झाली असल्याचे उदाहरणादाखल सभागृहाला दाखवून दिले. यावेळी तुपे यांनी हडपसरमधील नागरिकांच्या समस्या ग्राह्य धरून याबाबत योग्य तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यानिमित्ताने मागणी केली.

आज सभाहगृहात पुणे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. यावेळी पुरवणी मागण्यांच्या या जाडजूड पुस्तकात आपल्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा नसल्याचे म्हणत दुःख व्यक्त केले. पुणे केवळ नावापुरतीच स्मार्ट सिटी राहिली असून पुणे महानगरपालिका सुद्धा कशापद्धतीने दुर्लक्ष करते यावरून तुपे यांनी टीका केली आहे. केवळ योग्य तो निधी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे मतदारसंघातील बरीचशी कामे रखडली असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे.

सद्यपरिस्थितीबाबत बोलताना चेतन तुपे म्हणतात, माझे नागरिक जीएसटी भरतात, सगळ्या प्रकारचे टॅक्स भरतात, तरीही माझ्या नागरिकांना विकासापासून का वंचित ठेवलं जात आहे. हा असमतोल विकास असून माझ्या मतदार संघातील नागरिकांना सरळ अर्थसंकल्पग्रस्त म्हणून जाहीर करा. जर विकासाच्या बाबतीत आम्हाल एक रुपया मिळणार नसेल तर आम्ही टॅक्स तरी का भरायचा असा हल्लाबोल करीत त्यांनी सरकारलाच सवाल केला आहे.

हे सुद्धा वाचा…

Ajit Pawar : ‘अजितदादा म्हणतात, तुला काही कळत नाही…’

PWD : पीडब्ल्यूडी मंत्र्यांनी अध‍िकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

Ajit Pawar Speech : अजितदादा म्हणाले, मी असा झापेन की…

पाणीपुरवठा प्रश्नाबाबत बोलताना तुपे म्हणतात, महापालिका क्षेत्रात मुलभूत सुखसोयी असणे गरजेचे असते, त्यासाठी तर एक हजार कोटींचा तरतूद केलेली आहे. हडपसर भाग पुणे शहरात येत असल्याने 24/7 अशा पद्धतीने पाणी येणे गरजेचे आहे कारण पाणी पुरवठा हा मुलभूत सेवेत मोडतो. परंतु इथे तर या योजनेचा बट्ट्याबोळ उडालाय. २१०० कोटींची योजना गेली कित्येक वर्षे सुरू आहे. पाच – साडेपाच वर्षे झाली तरी सुद्धा ही योजना पूर्ण नाही होऊ शकली. पूर्वी दोन तास पाणी येत असे आता तर अर्धा तास पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता घर घर नल च्या एवजी या योजनेलाच घरघर लागल्याचे तुपे यांनी यावेळी सांगितले.

रस्त्यातील खड्डे आणि पावसाळी गटार यांच्या वाढत्या समस्येवर सुद्धा चेतन तुपे यांनी नाराजी व्यक्त केली. तुपे म्हणाले, रस्त्याला तर खड्डे किती आहेत हा तर प्रश्नच आहे. रस्ता शिल्लक आहे का हा त्याही पेक्षा मोठा प्रश्न आहे. पाऊस थोडा पडला की परत खड्डे पडतात. शिवाय त्यात भर म्हणून पावसाळ्यात खोदाखोदी सुरूआहे. पावसाळ्यात रस्त्यात खोदकाम करण्यास मनाई असून सुद्धा कोणी ऐकत नाही, परिणामी लोकं पडताहेत, जीव जातोय पण या सगळ्याच गोष्टींकडे कोण लक्ष देणार. निधीच मिळणार नसेल तर जनतेची कामं कशी करणार, त्यांच्या समस्या कशा सोडवणार असा सवालच तुपे यांनी केला आहे.

स्मार्ट सिटीची मुद्दा चेतन तुपे यांनी आवर्जून सभागृहात उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, स्मार्ट सिटी पुणे शहरात वाद सुरू झाला आहे. स्मार्ट सिटीने एक चौक विकसित केला आहे, परंतु  त्याचे उत्तर दायित्व महापालिकेने घ्यायचे की स्मार्ट सिटीने यावरून वाद सुरू झाला आहे. चौकाचं काम झालंय यात नागरिकांचा काय दोष, स्मार्ट सिटीने चौक केला आणि तो पुणे पालिका हद्दीतील आहे. त्या चौकाचे पुढे काय करायचं हा वाद जर होत असेल तर नागरिकांनी कोणाकडे पाहायचं. देखभालीचे उत्तरदायित्व कोणाचे, स्मार्टचे आता सगळंच अस्मार्ट झालंय असंच म्हणावं लागेल. इतकं विस्कळीत काम दुसरीकडे कुठेही झालेलं नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी ही केवळी कागदावर नावापुरतीच राहिली आहे, कुठलंच स्मार्ट घडलेलं नाही आहे, असे म्हणून तुपे यांनी स्मार्ट सिटीच्या कामावरच आता प्रश्न उपस्थित केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी