काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी असे स्पष्ट केले की ते पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून (Congress President Election) त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यांनी असे नमूद केले की जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येईल तेव्हा ते अध्यक्ष होणार आहेत किंवा नाही याबद्दल अधिक स्पष्टता येईल. राहुल गांधी सध्या काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) मध्ये भारतातील वेगवेगळया राज्यांमधून पदयात्रा करून लोकांशी संवाद साधत आहे. राहुल गांधीसह काँग्रेसचे (Congress) अनेक वरिष्ठ नेत्यांनी ‘भारत जोडो यात्रा’ सहभागी झाले आहेत. काँग्रेस पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीच्या दृष्टीने सामान्य जनतेशी संवाद साधून व्यूहरचना करण्याच्या संदर्भात ‘भारत जोडो यात्रा’ चे आयोजन केले आहे.
भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी तामिलनाडू मधील नागरकोइल येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, मला जे काही करायचे आहे ते मी ठरवलेले आहे. त्याबद्दल माझ्या मनात कोणताही गोंधळ नाही. या यात्रेमुळे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये मला एक सुजाण नागरिक होण्यास मदत होईल. या सुंदर देशाबद्दल आणि मला पुढे काय करायचे आहे या गोष्टींबद्दल अधिक चांगल्याप्रकारे स्पष्टता येईल.
भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश्य देशात भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यानंतर केलेल्या हानीची नुकसानभरपाई करणे आहे. या देशातील सर्वसामान्य जनता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या द्वेषाच्या राजकरणाला बळी पडणार नाही. भाजप आणि आरएसएस हे देशात धार्मिक मुद्दयांवरून समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे.
‘भारत जोडो यात्रा’ ची सुरूवात बुधवारी झाली. ही यात्रा एकूण १२ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशामधून भ्रमण करणार आहे. ही यात्रा प्रत्येक दिवशी दोन वेळांमध्ये विभाजित करण्यात आली आहे. सकाळी ७ ते १०: ३० या वेळेत दिवसातून पहिल्यांदा ही यात्रा निघेल. त्यानंतर दुपारी ३ ते ६: ३० यावेळेत दिवसातून दुसऱ्यांदा यात्रा केली जाईल. सकाळच्या सत्रात यात्रेत कमी कार्यकर्ते सहभागी होतील परंतु संध्याकाळी मोठया प्रमाणात लोकांचा या यात्रेमध्ये सहभाग असेल. हया यात्रेत कार्यकर्ते दररोज २२ ते २३ किलोमीटरचा पल्ला पूर्ण करतील.
हे सुद्धा वाचा –
Urvashi Rautela : उर्वशी रैतेला आली गणेश दर्शनाला, भक्तांनी दिल्या ऋषभ पंतच्या घोषणा !
Virat Kohli : अजूनही माझ्यात क्रिकेट बाकी; ७१ वे शतक झळकल्यानंतर विराट कोहलीचं वक्तव्य
या यात्रेमध्ये सुमारे ३० टक्के महिलांचा समावेश आहे. तर यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे सरासरी वय ३८ वर्ष आहे. सुमारे ५०,००० लोकांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
भारत जोडो यात्रा केरळ राज्यात ११ सप्टेंबरला दाखल होईल. केरळमध्ये तब्बल१८ दिवस प्रवास केल्यानंतर ३० सप्टेंबरला कर्नाटकात दाखल होईल. कर्नाटक राज्यात तब्बल २१ दिवस प्रवास केल्यानंतर ही यात्रा आपला मोर्चा उत्तरेकडील राज्यात वळवेल. हया यात्रेची सुरूवात तिरूवंनथपूरम, कोची, निलांबूर, मैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जलगाव, इंदोर, कोटा, दसुआ, अल्वर, बुलंदशहर, दिल्ली, अंबाला, पठानकोट, जम्मू मार्गे भ्रमण करेल आणि या यात्रेची सांगता श्रीनगर येथे होईल.