लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभर मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडत आहे. सगळीकडेच गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या असा नारा आज सगळीकडेच घुमत आहे, शिवाय ढोल ताशांचा गजर या मिरवणूक सोहळ्याची आणखीच शोभा वाढवत आहे. सगळ्याच ठिकाणी असे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असताना राज्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या आहेत. धुळ्यात गणेश विसर्जनाच्या वेळी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर जामनेर मध्ये सुद्धा विसर्जनाच्या वेळी एकाला वाचवत असताना तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विसर्जनाच्या दिवशी या घडलेल्या दुर्देवी घटनांवर राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, धुळ्यात गणेश विसर्जन करत असताना पाय घसरून नदीत पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राकेश आव्हाड असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर घटना धुळे येथील आनंदखेडे गावात घडली असून विसर्जनाच्या वेळीच हा धक्कादायक प्रकार घडल्याने आनंदखेडे गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा…
BMC : बीएमसीच्या परीक्षा घोटाळया विरोधात कामगार संघटना आक्रमक, परीक्षाच रद्द करण्याची केली मागणी
दरम्यान अशीच एक घटना जामखेड येथे सुद्धा घडली आहे. बाप्पाचे विसर्जन करीत असताना एका तरुणास एक लहान मुलगा बुडत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे त्या मुलाला वाचवण्यासाठी एका तरुण लगेचच पाण्यात उतरला परंतु त्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला. किशोर राजू माळी (वय 30) असे त्या तरुणाचे नाव आहे. दोन तासांच्या तपासानंतर अखेर किशोर माळींचा मृतदेहच हाती लागला आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.
तब्बल दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा मोठ्या उत्साहात, जल्लोषात गणोशोत्सव साजरा करण्यात आला. बाप्पाची दहा दिवस सेवा करून गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत. मोठ्या मंडळांच्या गणपतींचे आज विसर्जन होणार असून आजच्या या भारलेल्या वातावरणात सगळेचजण आज बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देणार आहेत. विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी घटना समोर येत आहेत, त्यामुळे गणेश भक्तांनी काळजी घेत विसर्जन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.