दहा दिवस मनोभावे बाप्पाची सेवा करून आज अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत गणेश भक्तांनी आज अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्त निरोप देत आहे. सकाळपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. लालबागचा राजा, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शनच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुक सुरू आहेत. विसर्जन स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई पालिकेकडूनही चौपाट्यांवर कर्मचारी तैनात केलेले आहेत. चौपट्यांवर येणारे गणेशभक्त गणरायाला अखेरचा निरोप देताना भावुक झाले होते. दुपारनंतर मात्र आता विसर्जनासाठी गर्दी वाढू लागली आहे. मुंबईच्या विविध चौपाटयांवर सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 7046 घरगुती आणि 302 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. मुबई महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये 2394 घरगुती आणि 53 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आलेले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टिचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर यंदा विसर्जनासाठी केवळ मूर्तीसोबत असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जातोय. त्यामुळे समुद्र किनIऱ्यांवर यंदा बघ्यांना पूर्णपणे बंदी आहे. जुहू बिचचा संपूर्ण किनाराच बांबूंनी सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदा विसर्जनादरम्यान संपूर्ण समुद्र किनारा रिकामा पाहायला मिळत आहे.
हे सुद्धा वाचा –
Ganeshotsav 2022 : दुर्दैवी! गणपती विसर्जन करताना दोघांचा बुडून मृत्यू
मुंबई महापालिकेचे तब्बल 10 हजार कर्मचारी 7 चौपाट्यांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच जुहू, दादर, गिरगाव, माहीम, मार्वे, आक्सा, गोराई या प्रमुख चौपाटय़ांवर विसर्जनासाठी विविध सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.