वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून इंडिया आघाडीमध्ये शामील होण्याच्या अफवांना थांबवण्यावही विनंती केली आहे. तसेच, काँग्रेसने कधीही INDIA आघाडीसाठी आमंत्रण पाठवले नसून INDIA आघाडीला जर खरेच भाजप विरोधात लढायचे असेल तर सर्व सेक्युलर पक्षांना सोबत घेतले पाहिजे, आमचे दरवाजे उघडे असल्याचा पुनरुच्चार या पत्रात करण्यात आला आहे.
I wrote a letter to @INCIndia President @kharge to request to clear the air and confirm the fact that Congress had never sent an invitation for #INDIAAlliance to @VBAforIndia despite our communication channels being open.
I hope to hear a reply from him very soon. pic.twitter.com/dWGIJKW6Rs
— Adv Priyadarshi Telang (@priyadarshi07) September 1, 2023
या पत्रात तेलंग यांनी लिहिले आहे की, ” इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) ची सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे तिसरी बैठक बोलावली जात असल्याने देशभर खळबळ उडाली आहे. तथापि, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (MPCC) कडून माझा पक्ष, वंचित बहुजन आघाडी (VBA) ला आमंत्रण पाठवण्यात आल्याचे काही विशिष्ट वर्गांकडून येत असलेल्या खोट्या दाव्यांमुळे आम्ही निराश झालो आहोत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आमंत्रण नाकारले आहे, अशी अटकळ बांधली जात आहे आणि प्रचार केला जात आहे. तुमच्या पक्षाकडून कोणतेही आमंत्रण पाठवण्यात आलेले नाही हे तुम्हाला आधीच माहीत आहे आणि म्हणूनच, आमंत्रण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
पुढे तेलंग आपल्या पत्रात म्हणाले, “आम्ही वंचित, बहुजन आणि मुस्लिमांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहोत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) च्या विचारसरणीच्या विरोधात. आम्ही लोकसभा निवडणूक, 2019 आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, 2019 मध्ये अनुक्रमे 6.98 आणि 5.57 टक्के मते मिळवली. INDIA आघाडीमध्ये सामील होण्याचे आमंत्रण आम्हाला का पाठवले गेले नाही हे एक गूढच आहे आणि वंचित, बहुजन आणि मुस्लिमांच्या पाठिंब्याशिवाय भाजप-आरएसएसशी लढण्याच्या आघाडीच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते”
हे ही वाचा
शरद पवारांनंतर माझा नंबर लागतो : मल्लिकार्जून खर्गे
अजित पवार गट घड्याळाच्याच आशेवर
मोदींच्या निकटवर्तीय मंत्र्याच्या घरात आढळला मृतदेह! मंत्री महोदय फसणार?
“शिवसेना उबाठा गटाने आमच्या वतीने कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे आमची स्वारस्यता व्यक्त करूनही कॉँग्रेसने कधीही वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण पाठवले नाही. याची जर तुम्ही पुष्टी केली तर आम्ही त्याचे कौतुक करू. आज भाजप-आरएसएस आपल्या देशाचे तुकडे करत आहेत. जर भारत भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यासाठी खरोखर गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे कर्तव्य आहे. आमचे दरवाजे खुले आहेत”, असे लिहून तेलंग यांनी पत्राची सांगता केली.
आता या पत्रानंतर कॉँग्रेस आणि INDIA आघाडीतील इतर घटक पक्ष वंचितला INDIA आघाडीमध्ये घेणार का हे पाहायला मिळणार आहे.