टीम लय भारी
मुंबई : सरकारी कर्मचा-यांना ड्रेस कोडचे निर्देश दिल्यानंतर आता केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना टेन्शन आले आहे. आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे. सरकारी कर्मचा-यांना रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?, असा सवाल आठवले यांनी विचारला आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील ड्रेसकोड वाद सध्या चांगलाच गाजतोय. त्यातच आता सरकारी कर्मचा-यांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत.
मंत्रालयात जीन्स, टी- शर्ट घालण्यास बंदी
शासकीय कर्मचा-यांनी सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहेत. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचा-यांना आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसेच स्लीपर्सही न वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.
महिला कर्मचा-यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचा-यांनी खादीचे कपडे घालावेत असे देखील नव्या नियमात सांगितले आहे.
कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचा-यांना अनुरूप ठरेल, अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते अशा निष्कर्षाला पोहोचत शासकीय कर्मचा-यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे.
राजकीय नेतेमंडळी म्हणजे पांढरे शुभ्र कपडे आणि डोळ्याला गॉगल अशी सुरूवातीच्या काळातील धारणा होती. त्यानंतर अलीकडे मोदी जॅकेट किंवा तत्सम पेहराव करणारी नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. काही वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील जीन्स आणि शर्ट अशा पेहरावात दिसले. पण रामदास आठवले यांना मात्र कायम रंगीबेरंगी कपड्यातच पाहायला मिळते. त्यांची वेगळी अशी एक ड्रेसिंग स्टाईल आहे. ते कायम रंगीत कपडे परिधान करून त्यावर एखादं जॅकेट घालून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात. आपल्या रंगीत पेहरावासाठी ओळखल्या जाणा-या रामदास आठवले यांनी थेट ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला. “राज्य सरकारने मंत्रालयात येणा-या कर्मचारी, अधिका-यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?”, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
शासकीय कर्मचा-यांसाठी पोशाख कसा असावा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांचा तसेच खासदार, आमदार असे लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकारी, खासगी कंपन्या, कार्यालयांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा दररोज वावर असतो. मंत्रालयात देश-विदेशातील नेते, अधिकारी येत असतात. कर्मचा-यांच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या आस्थापनेची विशिष्ट छाप भेट देणा-यांवर पडते. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम करीत असताना कार्यालयातील सर्वच अधिकारी कर्मचा-यांनी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच वेशभूषेबद्दल जागरूक राहावे. आपली वेशभूषा ही शासकीय कार्यालयास अनुरूप ठरेल याची काळजी घ्यावी. सरकारी कार्यालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारी विशेषत: कंत्राटी किंवा सल्लागार म्हणून काम करणारे शासकीय कर्मचा-यांना अनुरूप पोषाख घालत नसल्याने सरकारी कर्मचा-यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत राज्य सरकारने या कर्मचा-यांसाठी पेहराव कसा असावा याची बंधने घातली आहेत.