मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पहिल्या यादीतून पत्ता कट करण्यात आला. नाराज असलेले खडसे म्हणाले की, पक्षाला एक प्रश्न नक्की विचारणार आहे – नाथाभाऊंचा गुन्हा काय ?. 42 वर्षे पक्षाची सेवा करणे हा गुन्हा असेल, तर तो मी केलाय,’ प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे यांनी मनातील खदखद बोलून दाखविली.
भाजपच्या पहिल्या यादीत आयारामांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर), चंद्रकांत पाटील (कोथरुड), अतुल भोसले (कराड दक्षिण), शिवेंद्रराजे भोसले (जावळी), जयकुमार गोरे (माण) या आयारामांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश महेता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या दिग्गजांची नावे नाहीत.
खडसेंनी पक्षाच्या एबी फॉर्मशिवायच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते अधिकृतपणे पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील. भाजपने अनेक दिग्गजांना वेटिंगवर ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करणाऱ्या खडसे यांचे उमेदवारांच्या यादीत नाव नसल्यामुळे खडसे समर्थकही नाराज झाले आहेत.
खडसेंना जर दुसऱ्या यादीत स्थान मिळालं नाही तर ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन घोटाळ्यावरून खडसेंनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून भाजप श्रेष्ठींनी खडसेंकडे दुर्लक्ष केले आहे, किंबहूना त्यांना अडगळीत टाकले आहे.