लय भारी टीम
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
फोन टॅपिंग आणि स्नुपिंग झालेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेल चौकशी करेल. याबाबत अनिल देशमुख म्हणाले, “दिग्विजय सिंह यांनी फडणवीस सरकारकडून विरोधीपक्षाचे आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप झाल्याचे म्हटले आहे. आम्ही या प्रकरणाला गांभीर्याने घेत इतर पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान घेण्यासाठी इस्त्राईलला कोण गेलं होतं याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.