लय भारी न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर विधानसभा क्षेत्र… शान धर्मवीर आनंद दिघे साहेबांची !… गडकिल्ले शिवसेनेचे… आणि युतीत उमेदवार भाजपाचा ?… शिवसैनिक जागा हो !.. ठाण्यात तुम्हाला बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे…. हे आवाहन केले आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. मनसे उमेदवार अविनाश जाधव यांनी शिवसैनिकांच्या दुखऱ्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसैनिकांची मते भाजप उमेदवाराला जाण्याऐवजी ती आपल्याला मिळतील अशा पद्धतीने जाधव यांनी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
अविनाश जाधव यांच्या नावाचा हा मेसेज ठाण्यात जोरदार फिरू लागला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला निर्माण झाला. पण ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या संजय केळकर यांना तिकिट देण्यात आले आहे. महायुतीमध्ये हे तिकिट शिवसेनेलाच मिळायला हवे होते. अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा होती. पण केळकर हे विद्यमान आमदार आहेत. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी केळकर निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत महायुतीमध्ये केळकर यांनाच तिकिट देण्यात आले आहे.
परंतु सन 2014 ची परिस्थिती वेगळी होती. आता भाजपविरोधात जनसामान्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेला तिकिट मिळायला हवे होते, अशी शिवसैनिकांची भावना आहे. शिवसैनिकांच्या या नाराजीचा फायदा अविनाश जाधव यांनी उचलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने साद घातली आहे. केळकर यांच्याऐवजी जाधव यांनाच मतदान करण्याला सच्चे शिवसैनिक प्राधान्य देतील असे बोलले जात आहे. शिवसैनिक किती प्रमाणात जाधव यांना मतदान करतील यावरच जाधव यांचे यशापयश अवलंबून असल्याचे सूत्रांनी म्हणणे आहे.