तुषार खरात : टीम लय भारी
मुंबई : येत्या एक – दोन दिवसांत मंत्रालयात मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत. मलईदार पदावर बदली मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मातब्बर मंत्री व आमदारांची शिफारसपत्रे या अधिकाऱ्यांनी सादर केली आहेत (Mantralaya officers want cream post).
सह सचिव, उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होणार आहेत. महसूल, नगरविकास, पीडब्ल्यूडी अशा खात्यांमध्ये बदली मिळावी, यासाठी बहुतांश अधिकारी प्रयत्नशील आहेत. बदली हवी असलेल्या अधिकाऱ्यांनी ‘सामान्य प्रशासन विभागा’तील (जीएडी) अधिकाऱ्यांसोबत संधान साधले आहे.
उपसचिव, सहसचिव पदोन्नतीमध्ये ‘गडबड गोंधळ’; मंत्रालयात ‘कही खुशी, कही गम’
पुढाऱ्यांची पत्रे आणि जीएडीतील अधिकाऱ्यांसोबतचे संधान या आधारे हे संधीसाधू अधिकारी ‘मलईदार’ पदे मिळविण्यात यशस्वी होतील, असे सूत्रांनी सांगितले.
एकाच पदावर ८ – १० वर्षे बस्तान
मंत्रालयातील अधिकाऱ्यांना एकाच खात्यात सहा वर्षे काम करता येते. या सहा वर्षांमध्ये प्रत्येकी तीन वर्षे त्याच खात्यांत दोन वेगवेगळ्या पदांवर काम करावे लागते. परंतु मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे.
विशेषत: महसूल, नगरविकास इत्यादी खात्यांमध्ये एकाच पदांवर काम करणारे अधिकारी आहेत. महसूल विभागात एक अवर सचिव दहा वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांच्याकडे मुंबईतील जमिनींची जबाबदारी आहे. असे अधिकारी सरकारचे जावई आहेत का, असा सवाल केला जात आहे.
Clear out old, dusty files & clean up, Uddhav govt tells ‘plush’ Mantralaya
न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्राला तिलांजली
सन २०१९ मध्ये ‘उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके विरूद्ध महाराष्ट्र सरकार’ या खटल्यामध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात एक शपथपत्र सादर केले होते. राजकीय नेत्यांकडून आलेल्या शिफारसपत्रांच्या आधारे अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार नाही, असे राज्य सरकारने या शपथपत्रात नमूद केले होते.
हे शपथपत्र सरकारने धाब्यावर बसविले आहे. पुढाऱ्यांच्या शिफारसपत्राच्या आधारेच सर्रास बदल्या होत असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
जीएडीतील अधिकाऱ्यांनी मांडला आहे बदल्यांचा धंदा
मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जीएडीतील अधिकारी करीत असतात. जीएडीतील डेस्क क्रमांक १४ येथून या बदल्या होतात. अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना चुकीची माहिती देवून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘बदल्यांच्या धंद्या’ला चाप लावण्याची मागणी केली जात आहे.