पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून मराठी कलाकारांच्या झालेल्या अपमानाची चर्चा आता सगळीकडेच होऊ लागली आहे. शिवसेनेच्या महिला आमदार मनीषा कायंदे यांनी या प्रकरणावर आपले मत व्यक्त करत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे. दिल्लीत बसलेल्यांना खुश करण्यासाठी आणि आमची तुमच्यावर सर्वाधिक निष्ठा आहे हे वारंवार दिल्लीत बसलेल्यांना जाणवून देण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठी अस्मितेचे तीनतेरा वाजवत असल्याचा घणाघात आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर भारत स्वतंत्र झाला असे म्हणणारे आता ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहेत, असा टोला सुद्धा आमदार मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.
पु. ल. देशपांडे कला अकादमी ‘आजादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये ज्या कलाकारांना सहभागी व्हायचे आहे अशांना अकादमीच्या कार्यालयात येऊन अर्ज देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे अनेक मराठी कलाकारांनी याबाबतचे अर्ज देखील दिले होते. तसेच पु. ल. देशपांडे अकादमीतर्फे कलाकारांचे मानधन देखील निश्चित करण्यात आले. परंतु चार दिवसांत आमच्याकडे कलाकारांना देण्यासाठी पैसे नाही, असे कारण देत मराठी कलाकारांना या कार्यक्रमातून डावलण्यात आले.
याउलट आता हा कार्यक्रम नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने पु. ल. देशपांडे कला अकादमीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा या संस्थेच्या कलाकारांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, परंतु मराठी कलाकारांना देण्यासाठी पैसे नाही असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
दरम्यान या प्रकरणावर आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे-फडणवीस यांना फैलावर घेतले आहे. आपल्या पाशवी आकांक्षाच्या पूर्ततेसाठी दिल्लीश्वरांसमोर नाक घासण्याची जणू स्पर्धा चालल्याचे धोरण सध्या महाराष्ट्रात सामान्यांना अनुभवास येत आहे. सन 2014 साली स्वातंत्र्य मिळाल्याचे वारंवार सांगणारे सध्या “आजादी का अमृत महोत्सव” साजरा करत आहेत, असे मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे.
हे सुद्धा वाचा
OBC Reservation : उद्धव ठाकरेंचा ओबीसींबद्दल ‘कल्याणकारी’ निर्णय, प्रकाश शेंडगे यांनी मानले आभार !
Mahadev Jankar : महादेव जानकरांचा इमानी बाणा
एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेने सदर कार्यक्रमास मराठी कलाकारांना डावलून दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधील कलाकारांना संधी दिली असल्याचे कळते आहे . त्यामुळे मराठी कलाकारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सदर कलाकारांना देण्यासाठी पु. ल. देशपांडे अकादमी कडे पैसे नसल्याचे निरर्थक कारण देऊन मराठी कलाकारांचा विश्वासघात करण्यात आला आहे. पण यामुळे पु.ल. देशपांडे अकादमीला मोठ्या प्रमाणात मिळणारा पैसा कुठे जातो हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. एका महिन्यात सहा वेळा दिल्लीला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या निष्ठा दिल्लीश्ववरांच्या चरणी अर्पण केल्या असल्याचे वारंवार पहावयास मिळाले आहे. मात्र यामध्ये 12 कोटी जनतेची फरपट होताना दिसते आहे, असेही मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
परिणामी, पु. ल. देशपांडे अकादमीने हा सावळा गोंधळ दुरुस्त करून मराठी कलाकारांसह हा कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित करावा, अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.