लय भारी टीम
नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona virus) व्हायरसचा संसर्ग आणखी वाढू नये आणि नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी दूरदर्शनने एक ‘लय भारी’ शक्कल लढवली आहे. ९० च्या दशकात प्रसारित झालेली रामायण मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय (Corona effects) दूरदर्शनने घेतला आहे.
शनिवारी, २८ मार्चला सकाळी ९ वाजता या मालिकेचा पहिला भाग पुन्हा एकदा प्रसारित करण्यात येणार आहे.
रामायण मालिकेची ९० च्या दशकात प्रेक्षकांवर एवढी जादू होती की जेव्हा ही मालिका टीव्हीवर यायची तेव्हा रस्ते अक्षरश: ओस पडायचे. लोक घरात बसून ऐतिहासिक मालिका पाहण्याला प्राधान्य द्यायचे. तेव्हा फार कमी लोकांकडे टीव्ही असायचा. पण आता भारतात बहुतांश लोकांकडे टीव्ही आहे. त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा पाहण्यासाठी लोक घरात बसतील. मालिकेत काम करणारे कलाकार अरुण गोविल (राम) आणि दीपिका (सीता) यांना लोक देवाप्रमाणे पुजायचे.
माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, मला हे सांगायला आनंद होत आहे की आम्ही शनिवारपासून रामायण मालिका डीडी नॅशनलवर प्रसारित करत आहोत. पहिला भाग २८ मार्चला सकाळी ९ ते १० पर्यंत आणि दुसरा भाग रात्री ९ ते १० या काळात प्रसारित करण्यात येईल.