टीम लय भारी
लंडन : ‘कोरोना’ विषाणूने ( Covid-19 ) महाराष्ट्रातही डोके वर काढले आहे. अशा स्थितीत अन्य पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही जनतेची काळजी घेत आहेत. पण पक्षाचा एक नेता सध्या ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनमध्ये तर ‘कोरोना’ने कहर माजवला आहे. या बिकट स्थितीत हा नेता स्वत: व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेत आहेच, पण तिथे अडकलेल्या हजारो भारतीयांची सुद्धा काळजी घेत आहे. त्यासाठी ते ब्रिटीश सरकारकडे सतत पाठपुरावा करीत आहेत.
‘कोरोना’मुळे ( Covid-19 ) ब्रिटनमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. हे संकट निवारण करण्यासाठी राष्ट्रवादीचा हा नेता मदत करीत आहे. उमर फारूखी असे या युवा नेत्याचे नाव आहे. उमर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. ते औरंगाबादचे आहेत. पण सध्या ब्रिटनमध्ये कायद्याचे शिक्षण घेत घेत आहेत. सेंट्रल लँकशायर विद्यापीठात ते शिकत आहेत. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी व मुलेही तिकडेच आहेत. ‘मी कुटुंबासोबतच इकडे आहे, त्यामुळे मला फार त्रास नाही. पण अन्य भारतीय विद्यार्थ्यांसमोर ‘कोरोना’ने ( Covid-19 ) मोठेच संकट ओढळल्याचे’ उमर यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांच्यासह पंतप्राधान बोरिस जॉन्सन यांनाही ‘कोरोना’ची ( Covid-19 ) लागण झाली आहे. जॉन्सन यांना कोरोनाची ( Covid-19 ) लागण होण्याअगोदरच उमर फारूखींनी त्यांना एक पत्र लिहिले होते. त्यात परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांची कशी आभाळ झाली आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जॉन्सन प्रशासन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नक्कीच महत्वपूर्ण निर्णय घेईल अशी अपेक्षाही फारूखी यांनी व्यक्त केली.
ब्रिटनमध्ये तब्बल १७ हजार लोकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे, तर १ हजार जण मृत्यमूखी पडले आहे. ब्रिटनच्या अवतीभवती असलेल्या युरोपीय देशांमध्ये ‘कोरोना’ने ( Covid-19 ) थैमान घातले आहे. इटली, जर्मनी, स्पेन, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये ‘कोरोना’ ( Covid-19 ) नियंत्रणाच्या पलिकडे गेला आहे. ब्रिटनही पुरता हादरून गेल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटनमधील विविध विद्यापीठांमध्ये जवळपास ३०,००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. ‘कोरोना’च्या ( Covid-19 ) सुरुवातीच्या टप्प्यात अनेकजण मायदेशात परतले आहेत. पण सोमवारपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे हजारो भारतीय विद्यार्थी ब्रिटनमध्ये अडकून पडले आहेत. हे विद्यार्थी एक तर वसतिगृहांमध्ये राहतात, किंवा खोली भाड्याने घेऊन राहतात. नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. पण ‘कोरोना’मुळे ( Covid-19 ) नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. विद्यापीठ – महाविद्यालये बंद झाली आहेत. खायला काहीच नाही. दुकानांमध्ये सुद्धा पुरेसे खाद्यान्न मिळत नाही. खोल्यांचे भाडे द्यायला पैसे नाहीत. भाड्याने राहत असलेल्या लोकांकडून पैसे आकारण्यापासून तीन महिन्यांची सवलत ब्रिटिश सरकारने दिली आहे. पण ती किमान सहा महिने असायला हवी, अशी आपण ब्रिटीश सरकारकडे मागणी केली असल्याचे उमर यांनी सांगितले.
भारतीय विद्यार्थ्यांची येथे ‘निसू’ ( NISU ) नावाची संघटना आहे. ही संघटना सतत भारतीय उच्चायुक्तालयाकडे पाठपुरावा करीत आहे. अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशात नेण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत अशी त्यांची मागणी आहे. पण संपूर्ण विमान सेवा बंद असल्यामुळे मोठा पेच ओढवला आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे राहायचे कसे आणि खायचे काय हा मोठा जिकीरीचा प्रश्न बनला आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिटीश सरकारने काहीतरी करायला हवे अशी मागणी मी पत्रात केली असल्याचे उमर यांनी सांगितले.
‘कोरोना’च्या ( Covid-19 ) चाचणी केंद्रांची ब्रिटनमध्ये कमतरता आहे. विद्यापीठांमध्ये अशी चाचणी केंद्रे सुरू करायला हवीत. वसतिगृहांमध्ये राहण्याच्या व जेवणाच्या सुविधा वाढवायला हव्यात. वीज, गॅस, पाणी इत्यादी सवलती विद्यार्थ्यांनाही द्यायला हव्यात. लोकांचे ८० टक्के पगार सरकार देणार आहे, तशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही सुविधा द्याव्यात अशीही मागणी या पत्राद्वारे केली असल्याचे उमर फारूखी म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीत भारतीय विद्यार्थी वॉट्सअप, फोनवरून एकमेकांना धीर देत आहेत. तेथील खासगी कंपन्यांमधील लोकांना सरकारमार्फत ८० टक्के पगार देण्यात येणार आहे. असाच दिलासा परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांनाही द्यायला हवा, असे उमर यांनी सांगितले.
‘ब्रिटन’मध्ये काही दिवसांपूर्वी ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. पण त्या अगोदरपासूनच लोकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. लोकं बिल्कूल घरातून बाहेर पडत नाहीत. जास्त काळ टिकू शकेल अशा खाद्यान्न वस्तू अगोदरच घरात आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर जाण्याचा धोका कोणीही पत्करत नाही. फोन किंवा वॉट्सअपवरूनच एकमेकांच्या संपर्कात सगळेजण आहेत. काही खरेदी करायचे असेल तर पूर्ण शरीरभर सुरक्षा गणवेश परिधान करूनच लोकं बाहेर पडतात. मी स्वतः सुद्धा दहा – पंधरा दिवसांतूनच घराबाहेर पडतो. पण दुकानांत गर्दी नसते त्यावेळी पहाटे जातो. मोजकीच खरेदी करून लगेच घरात येतो. आल्यानंतर आणलेल्या सगळ्या वस्तू पटकन स्वच्छ धुतो. हात सुद्धा धुतो, असे उमर यांनी सांगितले.
आपल्या महाराष्ट्र सरकारने ‘कोरोना’च्या ( Covid-19 ) संदर्भात खूपच चांगली पाऊले टाकली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. त्यामुळे ‘कोरोना’ ( Covid-19 ) अटोक्यात आहे. यातून देशातील अन्य राज्ये आणि परदेशांतील अनेक सरकारांसमोर आदर्श उभा राहिला आहे. राज्य सरकार चांगले काम करीत आहे. पण लोकांनी सरकारला सहकार्य केले पाहीजे. लोकांनी घराबाहेर बिल्कूल जाता कामा नये. पुढे आणखी रूग्ण वाढू शकतात हे गृहीत धरून सरकारने ‘व्हेंटिलेटर्स’ची संख्या आणखी वाढवायला हवी, असेही उमर यांनी सुचविले.
आनंद महिंद्रांचे चांगले कार्य
देश व राज्य संकटात असताना उद्योजक आनंद महिंद्रा यांनी एक संपूर्ण इमारतच ‘कोरोना’च्या ( Covid-19 ) उपचारासाठी देऊ केली आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी ‘कोरोना’ग्रस्त रूग्णांना श्वास घेण्यासाठी एका ‘ब्रिथिंग बॅग’ तयार केली आहे. व्हेंटिलेटरप्रमाणे ही बॅग काम करते. हे तंत्रज्ञान मी मँचेस्टरच्या महापौरांना दाखविले. त्यांनी त्यांच्या ‘हेल्थ रिसर्च टीम’कडे या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर अभिप्राय मागविल्याचे उमर फारूखी यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा