लय भारी टीम
मुंबई : कोरोना वायरस (Corona virus) संकटाच्या निमित्ताने लोकांनी अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवारी, १ एप्रिल आहे. त्यानिमित्ताने ‘एप्रिल फूल’ कोणाला करु नका, भीतीचे वातावरण तयार करु नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
नागरिकांकडून १ एप्रिल निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज ‘एप्रिल फुल’ बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमाव बंदी उठली आहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे, अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा ‘एप्रिल फूल’साठी सोशल मीडियावर फिरणा-या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘एप्रिल फूल’ केल्यामुळे प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणा-या विरुद्ध तसेच त्या ग्रुप अॅडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसे लिखित स्वरूपाचे पत्रक ही त्यांनी काढले आहे.