मराठा आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज बुधवार, (13 सप्टेंबर) सोळावा दिवस आहे. सोमवारी, मराठा आरक्षणसंबंधी निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 1 महिन्यांची मुदत दिली असून आंदोलन चालूच ठेवण्याचे सांगितले. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी करत जरांगे पाटील यांनी 1 महिन्याच्या मुदतीनंतर सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच, उपोषण सोडताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला उपस्थित राहायला सांगितले आहे.
राज्य सरकारला मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांची मुदत देत जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारपुढे पाच अटी ठेवल्या आहेत. लिखित स्वरूपामध्ये या पाच अटी राज्य सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे, जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाच अटी
1. सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल काहीही आला तरी 1 महिन्यानंतर मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत.
2. महाराष्ट्रात मराठा समाजावर मराठा आंदोलनादारम्यान दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
3. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.
4. उपोषण सोडतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित असावेत.
5. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाज आणि राज्य सरकारमध्ये मध्यस्थी करावी.
जरांगे पाटील यांनी या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मागीतल्या आहेत. यावर, राज्य सरकार काय निर्णय घेते हे लवकरच स्पष्ट होईल. याशिवाय, जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्याकरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सर्व मंत्रिमंडळ उपस्थित राहणार का? यावर अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही.
हे ही वाचा
गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचा धोका; ठाण्यात फैलाव, एकाचा मृत्यू
देशात मुस्लिम, दलित आणि आदिवासी बहुजनांच्या नरसंहाराची शक्यता : प्रकाश आंबेडकर
शासन आपल्या दारी ? शेतकऱ्यांचा संसार सरणावरी…आठ महिन्यात मराठवाड्यात ६८५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
संभाजी भिडेंच्या मध्यस्थीमूळे आंदोलन रोखण्यात सरकारला यश?
वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी अंतरवली सराटी येथे भेट देऊन मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे प्रमुख संभाजी भिडे यांनीदेखील मंगळवारी, आंतरवली सरटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. संभाजी भिडे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून मनोज जरांगे पाटील याना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे, राज्य सरकारने उपोषण रोखण्यासाठी संभाजी भिडे यांचा आधार घेतला आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पण मराठा आंदोलनाबाबत विचार करण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्यांचा अवधि मिळाला असून भिडे यांच्या मध्यस्थीचा राज्य सरकारला थोडा दिलासा मिळाला आहे.