नाशिक ड्रग्स रॅकेट प्रकरणाबद्दल शिवसेना उबाठा गट आता चांगलाच आक्रमक झाला आहे. शुक्रवारी, (20 ऑक्टोबर) नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमधील ड्रग्स रॅकेटविरोधात मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील लोकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्य सरकार, भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “नाशिक हा आमचा आत्मा असून आमचा देव, आमचा धर्म इथेच आहे. मात्र आता इथे कोट्यवधींचा ड्रग्ज व्यापार चालला आहे. आता या सर्वांना रामकुंडात बुडवण्याची नाही तर तुडवण्याची वेळ आलीय,” असे व्यक्तव्य त्यांनी यावेळी केले.
संजय राऊत यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “नाशिक मधील हे प्रकरण तरुणांची पिढी बरबाद करणारं आहे. त्यामुळे आम्ही भूमिका घेऊन तरुणांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. नाशिकमधील या प्रकरणात कोण कोण आहे हे स्पष्ट आहे. छोट्या भाभीची चौकशी सुरू आहे. मोठ्या भाभीचं काय? 15 लाख रुपये हप्ता महिन्याला ड्रग्स माफियाकडून दिले जात होते. या शहरातील आमदारांना काय हप्ता मिळत होता हे पोलीस रेकॉर्डवर आहे. पालकमंत्र्यांना काय मिळत होतं, नांदगावपासून मालेगावपर्यंतचा सगळा हिशोब गृहमंत्र्यांना माहीत आहे.”
“नाशिकच्या ड्रग्स रॅकेटच्या मुळापर्यंत जायचं आहे. नाशिक वाचवायचं आहे. नाशिक हा आमचा आत्मा असून आमचा देव, आमचा धर्म इथेच आहे. पिढी उद्ध्वस्त होताना पाहायचं नाही. शहरात ड्रग्सचा कोट्यवधीचा व्यवहार आणि व्यापार सुरू आहे. या सर्वांना रामकुंडात बुडवा नाही तर तुडवा. माझं आव्हान आहे, काय करणार आहात? अटक करता का? करा. एकदा तुरुंगात गेलो. परत जाईल. मला सांगू नका. शिवसैनिकांना धमकी देऊ नका. नाशिक ड्रग्स मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आज रस्त्यावर उतरलो. उद्या नाशिक बंद करू,” असे राऊत म्हणाले.
हे ही वाचा
मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही – मनोज जरांगे-पाटील
मराठा-कुणबी एकच; २२ ऑक्टोबरला ठरणार आंदोलनाची दिशा; जरांगे पुन्हा आक्रमक
सरकारी कंत्राटी भरतीसंदर्भात मोठा निर्णय…
राऊत पुढे म्हणाले, “काल शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक काढलं. विद्यार्थ्यांनी मोर्चात जायचं नाही, हा मोर्चा विद्यार्थ्यांसाठी असून या तरुणांना वाचवण्यासाठी मोर्चा आहे. परंतु, विद्यार्थ्यांसाठी मोर्चा असताना शिक्षणमंत्री मोर्चात विद्यार्थ्यांना सहभागी होवू देत नाही, याचा अर्थ शिक्षण विभागापर्यंत हफ्ता जातो का? शिक्षण मंत्री राजीनामा द्या. गृहमंत्र्यांना इशारा आहे. नाशिकच्या ड्रग्सच्या प्रश्नावर बोला. इकडची तिकडची गोष्ट सांगू नका. ही गोष्ट तुमच्या घरापर्यंत जाईल.”