टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’ काळात गेल्या आठवड्यात मंत्र्यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांच्याकडे भेटायला मोठ्या संख्येने अनेकजण येत होते. पण ही सगळी लगबग होती केवळ एकाच कारणासाठी. ती म्हणजे ‘बदल्या’ ! ( Mahavikas Aghadi government transferred officers )
मंत्र्यांकडून बदल्या करून घेण्यासाठी आमदार, खासदार, राजकीय कार्यकर्ते अशी मंडळी मंत्रालयात चकरा मारत होते. कोणाच्या कुठे बदल्या करायच्या याचे ‘अर्थ’गणित सर्व खात्यांच्या मंत्र्यांनी शुक्रवारीच उरकले आहे. अर्थगणितांची पुर्तता झाल्यानंतर बदल्यांचे आदेश जारी होऊ लागले आहेत. अनेक बदल्यांचे आदेश अजून येणे बाकी आहे.
विशेष म्हणजे, मलईदार पदे मिळविण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डींग लावली होती. मंत्र्यांच्या निकटच्या लोकांशी संधान साधणे, आमदार, खासदारांची मदत घेणे, प्रभावी मंत्र्यांना जावून भेटणे असे उपद्व्याप अधिकारी करीत होते.
मलईदार पदांसाठी वाट्टेल तेवढी किंमती मोजल्या जात असल्याचे दिसून आले. झालेल्या बहुतांश बदल्यांमध्ये ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे मारली आहेत.
हे सुद्धा वाचा
सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा
Breaking : पोलिसांच्या बदल्यांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
Breaking : तहसिलदारांच्या बदल्यांचा आदेश जारी; वाचा तुमच्या तालुक्यात कोण आले, कोण गेले
उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दणका, IAS मिलिंद म्हैसकर यांची केली उचलबांगडी
माणच्या निष्काळजी प्रांताधिकारी, तहसिलदारांची उचलबांगडी होणार
कृषी, ग्रामविकास, महसूल, गृह, पीडब्ल्यूडी, सहकार इत्यादी खात्यांमधील बदल्यांच्या एका पेक्षा एक धक्कादायक सूरस कथा ‘लय भारी’च्या हाती लागल्या आहेत.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची उचलबांगडी, तर पात्रता नसणाऱ्यांना संधी असे प्रकारही मोठ्या प्रमाणात झाले आहेत.
बदल्यांसाठी झालेल्या व्यवहारांचे आकडे ऐकले तर सामान्य माणसांचे डोळे पांढरे होतील इतके मोठे गैरप्रकार झाल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली.
‘कोरोना’ काळात मंत्र्यांना मलिदा
‘कोरोना’ महामारीमध्ये सगळी विकास कामे ठप्प झाली आहेत. विकास कामांच्या आडून मंत्र्यांना मोबदला मिळवता येतो. परंतु कामेच होत नसल्याने अर्थप्राप्ती थंडावली होती. पण बदल्यांमुळे मात्र मंत्र्यांची चांदी झाली आहे.
अधिकारी स्वतःहूनच थैल्या घेऊन बदलीसाठी मंत्र्यांपर्यंत पोहचत होते. एकेका जागेसाठी अनेकजण मागे लागले होते. त्यामुळे मंत्र्यांकडे काहीही न करता चांगला मलिदा प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ सुगीचा ठरला. बदल्यांच्या कामात त्यांनाही वाटा मिळाल्याने ‘कोरोना’तील त्यांचा दुष्काळ संपला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बदल्यांचे प्रमाण घटविल्याने वाढले दर
दरवर्षी एप्रिल – मे मध्येच बदल्या होतात. पण यंदा ‘कोरोना’मुळे त्या लांबणीवर पडल्या. सुरूवातीला ३१ जुलैपर्यंतची मुदत होती. नंतर ती १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली. गृह विभागाने तर १५ ऑगस्टपर्यंत वाढविली.
दरवर्षी साधारण ३० टक्के बदल्या केल्या जातात. यंदा त्या निम्म्याच म्हणजे १५ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. बदल्यांचे प्रमाण घटविल्यामुळे मलईदार पदांसाठी स्पर्धा निर्माण झाली. कितीही पैसे देतो पण ‘हीच’ किंवा ‘यापैकी’ एक जागा द्या, अशी मागणी इच्छूक अधिकाऱ्याकडून होत होती. त्यामुळे बदल्यांचे दर आकाशाला भिडल्याचे सूत्रांनी सांगितले.
बदली करून घेण्यासाठी अधिकारी कुठल्याही थराला गेल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या खात्याच्या मातब्बर मंत्र्याची भेट घेऊन आपल्या खात्याच्या मंत्र्यांवर बदलीसाठी दबाव आणण्याचे प्रकारही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.