महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी बरीच महत्त्वपूर्ण माहीती दिली आहे(Learn Business Management from the Bee). त्यांनी सांगितल्याप्रमाणे मधमाश्यांकडून बिझनेस मॅनेजमेंट सर्वांनीच शिकायला हवं. मधमाशीचं आयुष्य हे केवळ ३ ते ४ महिन्यांचं असतं. पण या कालावधीतही ती तिच्या वयानुसार ठराविक काम करतच असते. घर स्वच्छ कसे ठेवावे, ते बांधावे कसे असे सर्व धडे तिला जन्मतःच दिले जातात. शिस्त, एकोपा शिवाय टीम वर्क या गोष्टी मधमाश्यांकडून माणसाने शिकणयाची फार गरज आहे.
मधमाश्यांसारखा आर्किटेक शोधून सापडणार नाही, ३ किलो मध साठवता येईल आणि सर्व मधमाश्या राहू शकतील अशा घराची अगदी सुबक अशी बांधणी मधमाश्या करत असतात. फुलांच्या परागकणातून मकरंद मधून मध गोळा केले असता त्यात ८० टक्के पाणी आणि २० टक्के साखर असते, पण तेच गोळा करून मधमाशी पोळ्यात साठवते तेव्हा त्यात ८० टक्के साखर आणि २० टक्के पाणी असते, ही किमया मधमाशीच करू शकते. स्वयंशिस्त जगणारी मधमाशी कमी कालावधीत जास्त अन्न साठवून ते अधिक काळ टिकवून कसे ठेवावे याचे उत्तम उदाहरण आहे.