टीम लय भारी
मुंबई : देशभक्ती, देशसेवा, देशप्रेम याचे पेटंट केवळ आपल्याकडेच आहे. बाकीचे सगळे देशद्रोही अशी ढोलकी भारतीय जनता पक्षाचे नेते सतत वाजवत असतात. ढोलकी वाजविण्यापलिकडे भाजपगण देशसेवकांसाठी सुद्धा काहीच करीत नाहीत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे ही वस्तुस्थिती समोर आली आहे ( Balasaheb Thorat taken decision for patriot )
माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या पत्नी यांच्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
देशाची सेवा करणाऱ्या या लोकांना सरकारकडून विविध लाभ दिले जातात. यांत ‘सरकारी जमीन’ देण्याबाबतही काही योजना आहेत. परंतु सरकारी नियमांच्या कोलदांड्यामुळे जमिनीचा लाभ मिळणे या लोकांना कठीण जात होते.
महसूल खात्याचे प्रमुख या नात्याने थोरात यांनी हा कोलदांडाच काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा सैनिकांच्या पत्नींना आता जमिनीचा लाभ सहजपणे मिळणार आहे ( Ex soldier, Freedom fighter will entitle for land scheme ).
जमिनीचा लाभ मिळविण्यासाठी वरील लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रूपयांच्या मर्यादेत असावे असा विचित्र व अन्यायकारक नियम होता.
हे सुद्धा वाचा
Politics : देवेंद्र फडणविसांनी मारली थाप, बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला संताप
Balasaheb Thorat : भाजपाला भारतीय शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतो – बाळासाहेब थोरात
वास्तवात, लाभार्थ्यांना साधी पेन्शन जरी असली तरी ती 1 लाखाच्या मर्यादेपुढे जात होती. त्यामुळे जमिनीचा लाभ कुणालाच मिळत नव्हता. परिणामी ही योजना नुसतीच कागदावर होती.
सीमेवर लढणारे अनेक सैनिक हुतात्मा झालेले आहेत. अशा हुतात्मा सैनिकांच्या पत्नींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे 1 लाख मर्यादेचा नियम बाळासाहेब थोरात यांनी बदलून टाकला आहे. त्यासाठी थोरात यांनी ‘महाराष्ट्र जमीन महसूल कायद्या’त बदल केला आहे.
नव्या बदलानुसार आता 8 लाख रुपयांच्या मर्यादेत वार्षिक उत्पन्न असलेले माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक व हुतात्मा सैनिकांच्या पत्नी यांना जमिनीचा लाभ मिळणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
जमिनीच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु उत्पन्नाच्या अटीमुळे आद्यापही लाभ न मिळालेल्या अनेकांना आता आपल्या हक्काची जमीन मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जवळपास चार वर्षे महसूल खात्याचे मंत्री होते. पण चार वर्षात देशसेवकांचा हा जटील प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी काहीच केले नाही. बाळासाहेब थोरात यांनी मात्र मंत्री झाल्यानंतर पहिल्याच वर्षात जमिनीच्या लाभासाठी मोठा निर्णय घेऊन टाकला आहे.