पुणे येथे, “निर्भय बनो,” या लोक चळवळीच्या माध्यमातून जनसामान्यांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, सनदशीर मार्गाने लोकांना प्रबोधित करण्यासाठी राष्ट्रसेवा दल कार्यालय, सिंहगड रोड ,पुणे येथे आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, एडवोकेटनं असीम सरोदे, विचारवंत व पर्यावरण तज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी, आणि इतर मान्यवर तसेच काही महिला कार्यकर्त्यांवर काही राजकीय पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पोलिसांसमोर जीवघेणा हल्ला केला. त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. काही महिला कार्यकर्त्यांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले.ही घटना केवळ पत्रकार, वक्ते, विचारवंत, कलावंत , कार्यकर्ते यांच्यावर हल्ला नसून तो भारतीय लोकशाहीवरचा हल्ला आहे. असे अंनिसचे म्हणणे आहे.
निर्भय बनो कार्यक्रमातील वक्ते आणि कार्यकर्ते यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व पुरोगामी , परिवर्तनवादी समविचारी कार्यकर्ते, नागरिक यांच्यावतीने या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला. तसे पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी , नाशिक यांना देण्यात आले.
निषेधाच्या पत्रात पुढे म्हटले आहे की ज्या सनातनी , धर्मांध शक्तींनी ही हिंसक घटना जाणिवपूर्वक घडवून आणली, त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
अलीकडच्या काही दिवसांपासून छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांच्या महाराष्ट्रात दिवसाढवळ्या हिंसक घटनांच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. परिणामी महाराष्ट्रातील जनजीवन अतिशय भेदरलेल्या अवस्थेत दिवस कंठीत आहे. सर्वसामान्य माणूस मनातून अतिशय सैरभैर झाला असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक ,आर्थिक जीवनामध्ये आज प्रचंड अस्थिरता, अगतिकता, असुरक्षितता निर्माण झाली आहे . राज्यकर्त्यांनी समाजाच्या ह्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करून जनसामान्यांच्या दररोजच्या जगण्याला दिलासा, आधार देणे अत्यंत आवश्यक आहे.
मात्र याऐवजी जर गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत असेल, ती फोफावत असेल आणि ती खपून घेतली जात असेल तर यापुढील काळात भारत देशाची लोकशाही वाचविण्यासाठी सर्व पुरोगामी आणि विवेकवादी विचारसरणीच्या व्यक्ती आणि समूह मोठ्या प्रमाणात सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. सर्वच राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांना आणि राज्यकर्त्यांना हा निर्वाणीचा इशारा देण्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे .
या पत्रावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह प्रा. डॉ .सुदेश घोडेराव, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल, शहर कार्याध्यक्षा प्रा. आशा लांडगे, विजया गोराणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.