नाशिक महापालिकेच्या शाळा स्मार्ट योजने अंतर्गत कात टाकत असून आतापर्यत 82 शाळांमधील साडे सहाशे वर्ग खोल्यांना स्मार्ट टच दिला आहे. खाजगी शाळांना तोडीस तोड म्हणून मनपाच्या शाळा स्मार्ट होत आहे. पालकांमधील मनपाच्या शाळेविषयीची नकारत्मकता दूर करण्यासाठी शिक्षण विभाग लवकरच शहरभर स्मार्ट स्कूलची माहिती घरोघरी पोहचवणार आहे. सहाही विभागात एलइडीद्वारे स्मार्ट स्कूलमध्ये विद्यार्थ्याना मिळ्णाऱ्या सुविधा अन बदललेले रुपडे दाखवले जाणार आहे.स्मार्ट स्कूलमुळे मनपाच्या 82 शाळांचा चेहरा मोहरा बदलला आहे. यापूर्वी महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी केवळ आर्थिक परिस्थिती बेताची नसलेल्या पालकांचीच मूले मनपा शाळात प्रवेश घेताना दिसायची.
परंतु लवकरच हे चित्र बदलणार आहे.
दरम्यान स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे शहरातील इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी आता महापालिका शाळांकडे आकर्षित होत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहरात 88 प्राथमिक व 12 माध्यमिक अशा एकूण 100 शाळा आहेत. या शाळांमधून 29 हजार 852 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या 82 शाळांमधील 656 वर्गखोल्यांमध्ये डिजिटल कन्टेन्ट, इंटरनेट व स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन सॉफ्टवेअर, लॅन कनेक्टिव्हिटी युक्त 75 इंची डिजिटल फळा उभारण्यात आला आहे. या शाळांमध्ये ग्रीन बोर्ड आणि सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बॅच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाईट्स, छतावरील पंखे पुरविण्यात आले असून रंगकाम आणि किरकोळ दुरुस्तीची कामेदेखील करण्यात आली आहे. स्मार्ट स्कूल अंतर्गत प्रत्येक शाळेसाठी मुख्याध्यापकांच्या दालनात नियंत्रण कक्ष प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 800 शिक्षकांना प्रशिक्षण, प्रत्येक संगणक कक्षात 20 संगणक, सर्व्हर, प्रिंटर आणि लॅन कनेक्टिव्हिटी, एकुण 656 वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित केले असून आतापर्यत 82 शाळांमध्ये प्रकल्पांची अंमलबजावणी झाली आहे.
स्मार्ट स्कूलमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये अमुलाग्र बदल झाले असून गुणवत्तेपासून ते अत्याधुनिक ज्ञान विद्यार्थ्याना मिळ्त आहे. पालिकेच्या शाळांमध्ये झालेले बदल संपूर्ण शहरात पालकांना स्मार्ट स्कूलची माहिती घरोघरी दिली जाणार आहे. यातून पालकांमध्ये नक्कीच मनपा शाळांकडेे बघण्याचा दुष्टीकोण बदलेल.
-बी.टी.पाटील, मनपा प्रशासनाधिकारी,