31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यदिल्लीत गोंधळ, राज्यातही गोंधळ...

दिल्लीत गोंधळ, राज्यातही गोंधळ…

टीम लय भारी : अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

मुंबई : कोरोना वरील लस विरोधी पक्षासाठी घातक आहे. मी भाजपची लस घेणार नाही, अशा संमिश्र वक्तव्यांनी कोरोना वरील लस येण्याआधीच वादात (Chaos) सापडली आहे. एकीकडे प्रचंड घाई करून केंद्र सरकार लस आणण्याची तयारी करत असतानाच त्याला विविध राज्यातून विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीला अटकाव करण्यासाठी सध्या जगभरात विविध औषध कंपन्या लस आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लशीना विविध देशात आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

भारतात भारत बायोटेक आणि सिरम यांनी उत्पादित केलेल्या लसीना तशी मान्यता नव वर्षाच्या पहिल्या दिवशी देण्यात आली. त्यात भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची लस असून सिरमची कोविशिल्ड लस ही ऑक्सफर्डच्या मदतीने आणि तिथेच संशोधित करून भारतात आणण्यात आली आहे. पुणे स्थित सीरम कंपनीत केवळ या लसीचे बॉटलींग होणार आहे. त्याबाबतचे कोणतेही संशोधन येथे झालेले नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

या दोन्ही लसीना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने आपत्कालीन वापरासाठी जरी मान्यता दिली असली तरी या दोन्ही लसीचे चाचणी अहवाल हे केवळ तिस-या टप्प्यातील निष्कर्ष वर आधारित आहेत. लस आणण्यासाठी जगभरात जी घाई सुरू आहे त्याला भारत ही अपवाद ठरलेला नाही. कारण कोविड 19 हा विषाणू त्याचे जनुकीय बदल सातत्याने करत आहे. परिणामी लक्षणे आणि त्यापासून असलेला धोका याचा अजूनही अभ्यास सुरू आहे. अलीकडेच ब्रिटन मधून आलेला नवीन विषाणू हा 70 टक्के वेगाने पसरत आहे. आणि त्यापासुन येणारी लक्षणे वेगळी आहेत.

एका पाहणी अहवालानुसार हा विषाणू 25 ते 30 हजार वेळा आपल्यात जनुकीय बदल करू शकतो. याबाबत तज्ञांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 12 हजार 115 वेळा या विषाणूने जनुकीय बदल केले आहेत. तर केवळ 200 बदला पर्यन्त शास्त्रज्ञांनी अभ्यास केल्याचे समजते.

सिरम आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेली लस ही किती परिणामकारक आहे आणि त्याचा बदलत्या जनुकीय विषाणूच्या लक्षणावर किती फरक पडेल याबाबत अजूनही तज्ञांनी शंका व्यक्त केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी जरी 100 टक्के ही लस परिणामकारक ठरेल असा दावा केला असला तरी त्याची खात्री कोणालाच देता येणार नाही. त्यामुळे घाईघाईने लस आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्याच्या गोंधळाचे चित्र नवी दिल्लीत दिसत आहे.

इकडे विविध राज्यातही लस देण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. सर्वत्र उत्साह असला तरी लोकांचा यानिमित्त असलेला बेफिकीरीपणा हा उलटण्याची चिन्हे आहेत. लस आली आता कोरोना संपला या अविर्भावात असलेल्या जनतेला खरे तर लस हे औषध नाही तर ती एक क्रिया आहे, त्यामुळे त्या विषाणूला अटकाव करण्याची क्षमता मानवी शरीरात येऊ शकते हे सांगणे गरजेचे आहे. विषाणू हा कधी नष्ट होत नाही तर त्याचा प्रभाव हा कालांतराने क्षीण होतो हे जनतेला सांगणे गरजेचे असताना केवळ लस आली याच आनंदात सर्वजण बुडाले आहेत.

दुसरीकडे त्याला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न विविध राज्यात करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तर भाजपने ही लस आणली असून ती मी घेणार नाही, असे जाहीर करून वादाला तोंड फोडले आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी ही लस घेतल्यास विरोधी पक्षाच्या नेत्यांना हानिकारक ठरू शकते, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.

ज्या राज्यात निवडणुक होत आहे, त्यापैकी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथे भाजप लसीच्या माध्यमातुन मतांची बेगमी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे निवडणुकी आधी अशी कोणतीही मोहीम अथवा लसीकरण कार्यक्रम राज्यात होऊ नये यासाठी ममता दीदी सक्रिय झाल्या आहेत. तिकडे तामिळनाडू मध्येही एआयडीएमकेने सुद्धा हीच भूमिका घेतली असल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.

पहिल्या टप्यात देशात आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार असली तरी त्याचा प्रत्यक्ष काय परिणाम होतो, यावरच सर्वसामान्य नागरिकांना लस देण्याच्या मार्ग अवलंबून आहे.

थोडक्यात घाईघाईने आणलेल्या लसीमुळे दिल्लीतही गोंधळ आणि राज्यातही गोंधळ अशी स्थिती झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी