नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काय चालले आहे, असा सवाल आता राज्यातून विचारला जात आहे. कारण या रुग्णालयात आठ दिवसांत तब्बल १०८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘इंडिया टुडे’ने ही बातमी दिली आहे. या बातमीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे बळी का जात आहेत, असा सवाल आता उपस्थित होत आहे. तर रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत सरकारकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.
गेल्या आठवड्यात नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या बातमीने राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेचच छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. त्यानंतर डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालयातील मृतांचा आकडा पुढील २४ तासांत ३१ वर गेला होता. त्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. मृतांमध्ये बालके आणि नवजात अर्भकांचाही समावेश होता. या रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर ६ आणि ७ ऑक्टोबर या २४ तासांत आणखी १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने नांदेडच्या या शासकीय रुग्णालयातील मृत्युचे तांडव कसे रोखायचे, या यक्षप्रश्न रुग्णालय प्रशासनाला सतावत आहे.
आता नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा आठ दिवसांत १०८ वर गेला आहे. रुग्णालयातील परिस्थिती एवढी गंभीर असताना रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती डीन देत आहेत. असे असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू का होत आहेत, याबाबत काहीही सांगितले जात नाही.
हे ही वाचा
दादांच्या पत्राला थोरल्या पवारांचे सडेतोड उत्तर… १०० दिवसांत स्वाभिमान गहाण
सुप्रिया सुळे कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? पवारांना ‘तो’ म्हणणारा कोण?
शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर? ठाकरेंचा शिवाजी पार्कवर
रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही म्हटले आहे. या सर्व प्रकरणात रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचेही बोलले जात आहे. रुग्ण जास्त आणि कर्मचारी, नर्स तसेच काळजी घेणारे कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे याची दखल घेऊन सरकार या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवेल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.