28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रठाण्यात शनिवारी बाबुराव बागूल यांच्या साहित्याचा जागर

ठाण्यात शनिवारी बाबुराव बागूल यांच्या साहित्याचा जागर

वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ऋचा’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही…..

अशासारख्या अनेक विद्रोही, क्रांतिकारी कविता लिहून मराठी साहित्याच्या भवतालाला झटके देणारे कवी, कथा, कादंबरी बाबुराव बागूल हे मराठी साहित्यातील एक तळपत्या सूर्यासारखे नाव.

ज्यांच्या साहित्यातून विद्रोहाच्या चिंगाऱ्या ठाई-ठाई विखुरलेल्या आहेत  ते क्रांतिकारी नाव म्हणजे  बाबुराव बागूल. बागूल यांच्या ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथा संग्रहाला यावर्षी साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमिताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएन महाराष्ट्रच्या वतीने बाबुराव बागूल साहित्य विचार परिषदेचे आयोजन शनिवारी (दि. १४ ऑक्टोबर) मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी करण्यात आले आहे.

या परिषदेचे उद्घाटन शे.का.प.चे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी १0.30 वा. होणार असून अध्यक्षस्थानी शिवा इंगोले असणार आहेत. या उद्घाटन सत्रात सुभाष लोमटे, कॉ. किशारे ढमाले, मधू मोहिते, त्रिशिला कांबळे आणि रवी मोरे हे प्रमुख पाहून म्हणून सहभागी होणार आहेत.

दुसऱ्या सत्रात बाबुराव बागूल यांचा समग्र साहित्य विचार या विषयावरील चर्चासत्रात राम दुतोंडे, डॉ. प्रकाश मोगले, प्रा. वंदना महाजन, डॉ. बी. रंगराव, डॉ. अनंत राऊत सहभागी होणार आहेत तर अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश शिरसाठ हे असणार आहेत. दुपारी ४ ते ६ या सत्रात ‘बाबुराव बागूल यांची समकालिन सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्टी’ या विषयावरील चर्चेत कॉ. विश्वास उटगी, अॅड. एम. ए. पाटील, डॉ. संजय रामराजे, अरविंद सुरवाडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. तर अध्यक्षस्थानी शामदादा गायकवाड असणार आहेत.

या साहित्य जागर परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी केले असून सर्व संबंधितांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती आयोजक संस्थेचे सचिव अॅड नाना आहिरे आणि सहसचिव सुबोध शाक्यरत्न यांनी केली आहे.

बाबुराव बागुल यांचा जीवनपट
बाबुराव बागुल (जुलै १७, १९३० – मार्च २६, २००८) हे नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात जन्मले. ते आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती. प्रभावी व विद्रोही भाषाशैली, जिवंत प्रसंगचित्रण, कारुण्य आणि क्रुरता रेखाटन हे त्यांच्या लेखनाचे विशेष गुण होते.

दलित साहित्यामध्ये मोठे योगदान देणारे एक प्रतिभावंत लेखक साहित्यिक म्हणून बाबूराव बागूल यांना एक नवी ओळख मिळालेले आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा व कादंबऱ्या या गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांचं व वेदनांचं प्रत्ययकारी वर्णन येते. स्त्रीप्रधान कथालेखन हा देखील त्यांच्या लिखाणाचा महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. ‘सूड’ कथेमध्ये बाबुराव बागुल यांनी वाडी वस्तीवरील स्त्रीच्या हृदयद्रावक व तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचं चित्रण केलेले आहे . या कथेतील स्त्री पात्र हे समाजातील स्त्रियांच्या शोषित पीडित सामाजिक स्थितीचं चित्रण करणारे आहे.

दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅंपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला.

चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कॅंपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.

हे सुद्धा वाचा 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे सव्वा वर्षात, सव्वाशे कोटींचे अर्थसहाय्य
श्यामची आई’ लवकरच प्रदर्शित होणार !
५ राज्यांच्या ७ नोव्हेंबरपासून निवडणुका, आचारसंहिता लागू

१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली.

१९५७ मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला.

‘अघोरी’, ‘कोंडी’,’पावशा’, ‘सरदार’, ‘भूमिहीन’, ‘मूकनायक’, ‘अपूर्वा’ अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. मार्च २६, २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले. आणि मराठीत वास्तववादी कथा-कादंबरी लिहिणाऱ्या एक काळाचा अस्त झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी