माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच त्यांच्या रोकठोक भूमिकेमुळे चर्चेत असतात. सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात जितेंद्र आव्हाड हे एक असे राजकारणी आहेत, ज्यांच्यासाठी त्यांचा मतदार हा सर्वप्रथम असतो. जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी थेट राज्य सरकार अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले आहे. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील कचरा समस्येच्या प्रश्नावरून राज्य सरकारला फैलावर घेतले आहे. जितेंद्र आव्हाड हे कायमच त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडताना दिसून येतात. जितेंद्र आव्हाड जिथे कुठे जातील तिथल्या समस्येवर ते कायमच भाष्य करत असतात.
ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या एम. एम. व्हॅली परिसरातील मोकळ्या जागेत गेल्या काही दिवसांपासून कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ठाणे शहरातील कचरा या परिसरात आणून टाकला जात असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. पण आता या प्रश्नावर थेट जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष घातल्याने राज्य सरकार किंवा सामान्य प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे स्थानिक जनतेचे लक्ष आहे.
दरम्यान, एम. एम. व्हॅली या ठिकाणी जमा झालेल्या कचऱ्याच्या प्रश्नावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे. संपूर्ण ठाणे शहरातील कचरा एम. एम. व्हॅली येथे आणून टाकला जात आहे. मुंब्रा परिसरातील सर्वात सुंदर वसाहत असलेल्या एम. एम. व्हॅली येथे कचरा आणून टाकला जात असल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
Diwali 2022 Coronavirus : बेफिकरीने दिवाळी साजरी करा पण कोरोनाचे नियम विसरू नका!
पुढील चार दिवसात जर का या परिसरात कचरा टाकणे थांबवले गेले नाही तर या ठिकाणी येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या फोडल्या जातील. नाही तर त्या गाड्या जाळल्या जातील, असा धमकीवजा इशारा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. स्वतःच्या मतदारांसाठी कायदा हातात घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसात जर का स्थानिक प्रशासनाकडून या कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यात आला नाही तर खरंच जितेंद्र आव्हाड हे कायदा हातात घेतील का ? हे पाहावे लागणार आहे.
एम.एम. व्हॅली जवळ प्रचंड कचरा जमा झाला आहे. ठाण्यातून सगळीकडून कचरा आणून मुंब्र्यातील सर्वात सुंदर वसाहतीत हा कचरा टाकला जातोय.4 दिवसात हे थांबवा.नाहीतर आलेली गाडी एकतर जाळली तरी जाईल, नाहीतर फोडली तरी जाईल. स्वतःच्या मतदारांसाठी कायदा हातात घेणं हा मी माझा जन्मसिद्ध हक्क समजतो. pic.twitter.com/bpw12uwREQ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 22, 2022