नवसापोटी उघड्यावरील दिल्या जाणाऱ्या पशुबळी विरोधात महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक व सिन्नर शाखेच्या वतीने आज वडांगळी येथे भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. प्रबोधन कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी जत्रेच्या परिसरात फेरफटका मारून उघड्यावर पशुबळी होतात किंवा कसे, तसेच इतर अनिष्ट ,अघोरी प्रथांचे अवलोकन केले . कत्तलखान्यात पशुबळी देणाऱ्या इसमाकडे चौकशी केली असता एकूणच उड्यावरील पशुबळी देण्यात आणि नवस करण्याच्या प्रमाणातही घट झाल्याचे समजले.
पोलिसांनीही याला दुजोरा दिला. प्रत्यक्षात तसे दिसत होते. यवतमाळ बीड, वाशिम, गुलबर्गा इथून आलेल्या काही भाविकांशी चर्चा केल्यानंतर असे समजले की ऐपत नसतानाही अनेक भाविक कर्जाऊ रक्कम घेऊन नवसपूर्तीसाठी आलेले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मंदिराच्या प्रांगणातच प्रबोधनाचा फलक लावून विशेषतः तरुण भाविकांचे आणि महिलांचे नवसापोटी पशुबळी देण्याच्या अनिष्ट व अघोरी प्रथेविरोधात प्रभावी प्रबोधन केले.
नवस करू नये, असे संतांनी निक्षून सांगितलेले आहे आणि उघड्यावर पशूबळी देऊ नयेत असा न्यायालयाचा आदेश आहे. त्याचे आपण पालन करावे,असे सांगून, कार्यकर्त्यांनी पुढे सांगितले की पशुबळीसाठी येणारा खर्च हा कुटुंबाचे आरोग्य , शिक्षण व इतर आवश्यक गरजांसाठी करावा.
या प्रबोधन प्रबोधन मोहिमेत अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शामसुंदर झळके, जिल्ह्या कायदेशीर सल्लागार ॲड समीर शिंदे, अरुण घोडेराव, कॉम्रेड हरिभाऊ तांबे ,महामित्र दत्ता वायचळे, मधुकर गिरी, प्रभाकर शिरसाठ, विजय खंडेराव, विजय बागुल बस्तिराम कुंदे, बापु चतुर ,प्रमोद काकडे आधी सिन्नर व नाशिकचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते.