29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे! पावसाबाबत वाचा हवामान खात्याचा नवीन...

पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे! पावसाबाबत वाचा हवामान खात्याचा नवीन अपडेट

पुढील 3 ते 4 दिवसांत विदर्भ आणि कोकण आणि गोव्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. गुजरात ते कर्नाटक किनार्‍यापर्यंत ऑफशोअर ट्रफ सक्रिय होईल. शिवाय, गुजरातवरील चक्रीवादळ आणि ओडिशावरील दुसरे चक्रीवादळ यामधील कुंड विकसित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागात पावसाचा जोर वाढेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून कमकुवत राहू शकतो. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. तर विदर्भातही ऑरेंज अलर्ट, पुण्यात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते. तर कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय असून मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.

हे सुद्धा वाचा:

मेल ट्रेनचे इंजिन फेल झाल्याने कसाराकडून मुंबईला येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा उशिराने

…10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली; जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

प्रणिता थोरातला उच्च शिक्षणासाठी जर्मन सरकारची फेलोशिप; जातीयता व लिंगभेदावर करणार संशोधन

शेतकऱ्यांसाठी कृषि सल्ला

विदर्भ, कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट भागातील शेतकरी बांधवांना शेतीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी असा सल्ला देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठावाडा व विदर्भ विभागातील शेतकऱ्यांना मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याच्या कालावधीत जनांवराना सुरक्षित ठिकाणी बांधा असा सल्ला दिला आहे.

मध्य महाराष्ट्र विभाग

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड तसेच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, यावल, रावेर येथील भागांना खरीप पिकांची पेरणी जमिनीत वाफसा स्थितीत असताना सुरु ठेवा. सोलापूर जिल्ह्यात व जळगाव जिल्ह्यात जमिनीत पुरेसा ओलावा मिळेपर्यंत पेरणीसाठी शेतकऱ्यांनी थांबावे. अहमदनगर, धुळे, नंदुरबार या ठिकाणी कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, भूईमूग या खरीप पिकांची पेरणी सुरु ठेवा. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात खात्रीशीर पाण्याची उपलब्धता असल्यास आडसाली ऊसाची लागवड करावी.

मराठवाडा विभाग

परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, संभाजी नगर या जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी या खरीप पिकांची पेरणी करावी.

पश्चिम विदर्भ विभाग

अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात खरीप पिकांची पेरणी ताबडतोब आटोपावी, त्याकरिता शक्यतो कमी कालावधीची पिके वापरावी.

पूर्व विदर्भ विभाग

नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे कापूस, सोयाबीन, टोमॅटो, काकडी या पिकांची जमिनीत वापसा स्थितीत आल्यानंतर पेरणी करावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी