राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे हे आज (ता. 23 ऑक्टोबर) संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. यावेळी त्यांनी दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली. धीर सोडू नका, मी तुमच्या सोबत आहे असे म्हणत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वस्त केले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सत्ताधाऱ्यांचे सुद्धा लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे पिक नुकसान पाहणीनंतर नेमके काय बोलतात ? सरकारच्या कारभारावर नेमके काय भाष्य करतात ? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे हे आज दुपारी संभाजीनगर येथे दाखल झाले. त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे देखील सहभागी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच येथील शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. काळजी करू नका, मी सोबत आहे. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.
यंदाच्या वर्षी पडलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक देखील हिरावून घेतले. मराठवाड्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी वर्ग मात्र चिंतेत सापडला आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात अंधार पसरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देताच शेतकऱ्यांनी आपल्या समस्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा अशी विनंती यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांना करण्यात आली.
गेल्या काही महिन्यामध्ये शिवसेना पक्षाला ग्रहण लागले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून देखील शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षाची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह देखील तात्पुरत्या काळासाठी गोठविण्यात आले आहे. एकंदरीतच गेल्या काही महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांना राजकरणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
Anandacha Shidha : दिवाळीतील आनंदाचा शिधा आता ऑफलाईन मिळणार
Lohi Gram Panchayat : लोही ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन
दरम्यान, राजकरणात उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या धक्क्यानंतर ते पहिल्यांदाच दौऱ्यावर निघाले आहेत. यासाठी त्यांनी पहिल्यांदा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. उद्धव ठाकरे हे संभाजीनगर विमानतळावर दाखल होताच त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. तसेच नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असल्याने यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.