नवे सरकार सत्तेत आले तरी राज्यातील बळीराजाच्या अडचणी संपेनात. विविध संकटांचा सामना करत कसंबसं आयुष्य रेटण्याचा प्रयत्न करीत असलेला शेतकरी वर्ग सध्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. कधी अस्मानी, कधी सुलतानी संकट येऊन बिलगत असल्याने शेतकरी पार वैतागून गेला आहे. यंदाच्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक सुद्धा पावसाच्या फटक्याने वाया गेल्यामुळे त्यांच्यासमोर सुद्धा मोठं संकट उभं राहिलं आहे. एकीकडे शेतकरी संकटामुळे बेहाल झाला असला तरीही प्रशासनाला त्याकडे ढुंकून बघायला सुद्धा वेळ नाही. या सगळ्यालाच कंटाळून वाशिमच्या एका शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर लावून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम अंचळ येथील रहिवासी दिव्यांग शेतकरी बाबुराव वानखडे यांनी अस्मानी, सुलतानी संकटांना कंटाळून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर एक पोस्टर लावलं त्यावर ‘शेतकऱ्यांना भिख नको….कुत्रे आवरा’ असे म्हणत ‘न्याय देता का कधी भेटू?’ असा सवाल करत यावेळी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या पोस्टरमुळे सध्या जिल्ह्यामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे.
हे सुद्धा वाचा…
Chal Ab Wahan : वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’! मराठमोळ्या जोडीचा हिंदी रोमँटिक अंदाज
T20 World Cup : ‘टीम इंडियासाठी धोक्याची घंटा!’ भारताचे सुपरस्टार ऑस्ट्रेलियात जाऊन फ्लॉप
Share Market : पडत्या शेअर मार्केटमध्ये ‘हे’ स्टॉक्स देणार खास रिटर्न्स
बाबुराव वानखेडे या दिव्यांग शेतकऱ्याचा शेतजमीन मिळवण्यासाठी गेली 12 वर्षे लढा सुरू आहे. लोकशाहीच्या व्यवस्थेनुसार सध्या त्यांचा प्रशासनासोबत लढा सुरू आहे. या लढ्यात आतातरी यश मिळावे या हेतूने वानखेडे यांनी पोस्टरच्या माध्यमातून आपली हाक प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खटाटोप केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या कारणांमुले अडचणींच्या गर्तेत सापडला आहे, तरी सुद्धा नवे सरकार आगामी निवडणूकीच्या धामधूमध्येच व्यस्थ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिली जात आहेत.
याच व्यवस्थेला धारेवर धरत वानखडे यांनी पोस्टरच्या माध्यमातून प्रशासनाल सुनावले आहे. या पोस्टरमध्ये बाबुराव वानखेडे लिहितात, आमची सहनशिलता संपली आहे. उखाळ्या, पाखाळ्या, कुरघोड्या बंद करा, शेतकऱ्यांना भिक नको, कुत्रे आवरा, रक्षकच झाले भक्षक, वाशिम जिल्ह्यातील भ्रष्टाचारी प्रशासनाचा नंगानाच बंद करा’ असे म्हणून त्यांनी शेतकऱ्यांके आतातरी लक्ष द्या म्हणून अनोख्या पद्धतीने लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये वरच्या बाजूला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले आहेत.
सध्या सणासुदीची धुमधाम सुरू आहे, त्यात दिवाळीचा सण सुद्धा तोंडावर आला आहे तरीसुद्धा अद्याप शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत शासनानं जाहीर केली नसल्याचे वानखेडे यांनी यावेळी म्हटले. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या या- प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पोस्टर मी लावल्याचे त्यांनी कबूल केले. या पोस्टरच्या माध्यमातून मला भेटायला कधी वेळ देता? असा प्रश्न करीत दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणीच त्यांनी यावेळी केली आहे. या संपुर्ण पार्श्वभूमीवर या व्यथित शेतकऱ्याकडे प्रशासनाचे लक्ष जाणार का हेच पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.