36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमंत्रालयMumbai Mantralaya : मंत्रालय आहे की, टुरिंग टॉकीज?

Mumbai Mantralaya : मंत्रालय आहे की, टुरिंग टॉकीज?

आमदार, मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी एकीकडं, गळ्यात गमछा, अंगात स्टार्च केलेली पांढरीधोट कपडे, आपल्या नेत्यांच्या मागं धावत असतात. त्यांना भेटायला मंत्रालयात येतात, ही मंत्रालयात जत्रा अलिकडं मोठ्याप्रमाणात भरत असल्याचं चित्र रोजच दिसतं

पूर्वी गावच्या जत्रेत टुरिंग टॉकिज यायच्या… जत्रेतला सिनेमा पाहण्यासाठी मग मोप गर्दी देखील व्हायची, तिकीटासाठी रांगाच्या रांगा लागायच्या… म्हणायचचं झालं तर ते तंबुचं थिअटर ‘हाऊसफुल’ व्हायची… मग गावातले तथाकथीत कमिटी सदस्य, कार्यकर्ते हे देखील आपल्या टोळक्यासह थेटराकडे यायचे, ”आमी कोण हाय म्हायत नाय का?” असा माज दाखवत ही मंडळी तंबुत घुसायची…. अशीच काहीशी तऱ्हा आज मंत्रालयाची झाली की काय? असा प्रश्न पडतो.

खरं तर कोरोना महामारीनंतर, राज्यात सत्तापालट देखील झाला. नवंनवं सरकार अजून 100 दिवस लोटले तरी स्थिरस्थावर झालेलं दिसत नाही, मंत्री मंडळाच्या विस्ताराचं घोडं देखील अजून अडकून पडलयं… पण मंत्रालयात बक्कळ गर्दीचा  रेकॉर्ड मात्र रोज मोडतोय. हौसे-नौसे-गवसे असे अनके जण मंत्रालयाच्या सहव्या मजल्यापर्यंत सैर करताना दिसत आहे. मंत्रालयात होणाऱ्या या अमाप गर्दीला आवर घालण्यासाठी अखेर दुपारी दोन नंतरच अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला. गर्दीवर नियंत्रणासाठी म्हणून हा निर्णय चांगला वाटत असला, तरी राज्यभरातून आपल्या अडीअडचणींचे गाठोडं पाठीवर टाकून ‘जनता’ मंत्रालयाच्या महाव्दारावरं दाताचं पाणी गिळत वाट बघत असते. लांबच्या लांब लागलेल्या रांगेत कधी आपला नंबर येणार, कधी आपलं काम होणार?, पुन्हा गावची गाडी कधी पकडायची? या विवंचनेत ही ‘रयत’ ताटकळत असल्याचं चित्र देखील रोजचंच आहे.

सामान्य माणसांच हे ताटकळणं एकीकडं आणि आमदार, मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी एकीकडं… गळ्यात गमछा, अंगात स्टार्च केलेली पांढरीधोट कपडे हे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या मागं धावत असतात. त्यांना भेटायला मंत्रालयात येतात, ही जत्रा मंत्रालयात  अलिकडं मोठ्याप्रमाणात भरत असल्याचं चित्र रोजच दिसतं.. शिंदे गटात असलेले आमदार संतोष बांगर काल मंत्रालयात आले… यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा तांडा देखील होता. आमदारांना आपल्या या 20 ते 25 जणांच्या तांड्यासह मंत्रालयात जायचं होतं.. प्रवेशव्दारावरून आत जात असताना तेथे सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी हा तांडा अडवला, त्यामुळे आधीच तापट असेलेले आमदार भडकले, त्यांनी पोलिस शिपायाला दमातच घेतलं त्याला शिविगाळ केली, एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ” माझ्याकडे पिस्तूल असतं तर सरळ गोळ्या घातल्या असत्या असं देखील आमदार बांगर म्हणाल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल गृहविभागाकडे पाठवला.
हे सुद्धा वाचा :
Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’
Mumbai News : मुंबई हायकोर्टाचे नाव आता महाराष्ट्र हायकोर्ट? वाचा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! मुलींची तस्करी करणारी टोळी गजाआड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील यात लक्ष घालावे लागले, त्यांनी आपल्या गटातील आमदार आणि गृहविभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा केली. तर आमदार बांगर यांनी मात्र असं काही झालचं नसल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. खरंतरं मंत्रालयात कामानिमित्त येणारी राज्यातील ‘जनता’ दिवसदिवस रांगेत उभी असते, कधी आपला नंबर येईल? कधी आपलं काम होईल? या काळजीने ताटकळत रांगेत उभी असलेली ही लोकं राज्यातल्या खेड्यापाड्यातून आलेली असतात, याचं कुणाला सोयरसुतक देखील दिसत नाही. तर दुसरीकडे असे साहेबांचे उत्साही कार्यकर्त्यांचे तांडे आपापल्या साहेबांच्या शेपट्यापकडून मंत्रालयाच्या ‘पिकनिक’ला येत असतात. मंत्रालयात रोजरोज होणारी कार्यकर्त्यांची ही जत्रा पाहून मंत्रालयाचं टुरिंग टॉकीज झालयं की काय असा प्रश्नच यामुळे उपस्थित होत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी