मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वगुणसंपन्न आहेत तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? असा आर्त सवाल बीड जिल्ह्याच्या दहिफळ बदमाऊली गावातील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल रमेश बैस यांना चक्क रक्ताच्या थेंबाने पत्र लिहून विचारला आहे. ह्रदयाला पाझर फोडणाऱ्या या पत्रामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून राज्यपालांकडून या पत्रावर काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीकांत विष्णू गदळे असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. लोकशाही जगात शेतकऱ्यांच्या पत्राला किंमत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा लिहून पेनाची शाई संपली. त्यामुळे मी आता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. माझ्या रक्ताला लोकशाही जगात किंमत आहे का? असा आर्त सवाल करून राज्यपाल महोदय आपण सांगा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वगुणसंपन्न आहेत तर शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? अशी विचारणा श्रीकांत गदळे यांनी राज्यपालांना केली आहे.
हे सुध्दा वाचा :
राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत
बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा ; ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक
राज्याच्या तिजोरीत खडखडाट; धनादेशांचे वितरण रोखले!
शेतकऱ्यांना अनुदानाची भीक नको, शेतीमालाला योग्य भाव द्या, अशी कळकळीची मागणी त्यांनी या पत्रातून केलेली आहे. जुने राज्यपाल बदलले, नवीन राज्यपाल आले, पण जुने प्रश्न नवीन राज्यपालांना सोडवता येणार का? असा सवालही गदळे यांनी पत्रात केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मला आमदार करा, मी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो, खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश बनवतो, असेही गदळे यांनी पत्रात नमूद केले आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गदळे यांनी हे पत्र राज्यपालांपर्यंत पोहचविले आहे. पत्राच्या शेवटी त्यांनी ‘जय किसान’ असा नारा दिलेला आहे.