टीम लय भारी
मुंबई : राज्यात कोरोना संकट काळात स्थलांतरित मजुरांसाठी काम करत असलेल्या अभिनेता सोनू सूदच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून टीका करण्यात आली होती. मात्र आता मनसेने देखील सोनू सूदवरील टिप्पणी प्रकरणात उडी घेतली आहे.
मा. संजय राऊत,
या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलत?
ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया…
मनाचा मोठेपणा दाखवुया…
असो ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार… #बसारडत— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 7, 2020
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (MNS questions to Sanjay Raut) या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहीण्या पलिकडे काय केलं असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्याने काम केलय त्याचं कौतुक करूया,मनाचा मोठेपणा दाखवुया असं त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘रडण्या’ पलिकडे तुमच्याकडुन काय अपेक्षा ठेवणार असा टोला देखील अमेय खोपकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.
तत्पूर्वी भाजपाचे नेते राम कदम यांनी देखील संजय राऊत यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. स्वत:ही करायचं नाही. सोनू सूदसारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत आहेत, त्यांचे कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत टीका करत आहेत. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे.
पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही. कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय? अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली.