महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या हिप बोन्सवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या होत्या. या बैठकांमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना लाचार होऊन निवडणूक लढवू नका, असा कानमंत्र दिला. त्यानंतर आता खरंच राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसून येत आहे. कारण राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कोणत्या वॉर्डमध्ये कमकुवत आहे, तसेच कोणते वॉर्ड पक्षासाठी अनुकूल आहेत, हे जाणून घेण्यासाठी एका खासगी सर्वेक्षण कंपनीला याबाबतचे काम दिले असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्वेक्षणाचे काम हे पुण्यातील एका सर्वेक्षण संस्थेला दिले आहे. या संस्थेकडून मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एकूण १०० वॉर्डचे सर्वेक्षण करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून पहिल्यांदाच कोणत्या तरी संस्थेला सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची गरज लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या सर्वेक्षणातून पक्षाला ते कोणत्या वॉर्डमध्ये कमकुवत आहेत किंवा कोणते वॉर्ड त्यांना अनुकूल आहेत, याबाबतची सविस्तर माहिती देईल. या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून पक्षाला कोणत्या वॉर्डमध्ये पक्षातील कोणत्या व्यक्तीचा प्रभाव आहे, हे जाणून घेण्यास अधिक मदत होईल. तसेच मतदारांबाबतही बरीचशी माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कळू शकेल, असे मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा
Raj Thackeray : बरे होताच राज ठाकरे आले ‘ऍक्शन मोड’मध्ये
Raj Thackeray : लाचार होऊन निवडणूक लढवू नका : राज ठाकरे
दरम्यान, या सर्वेक्षण संस्थेकडून एकूण तीन टप्प्यामध्ये पक्षाला वॉर्ड, उमेदवार आणि मतदारांबाबतचा अहवाल देण्यात येईल यामध्ये कोणत्या वॉर्डमध्ये पक्षाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणता वॉर्ड पक्षासाठी अनुकूल आहे, वॉर्ड निहाय जातीचे समीकरण, वॉर्डमधील राजकीय परिस्थिती अशा मुद्यांचा अहवाल पक्षाला सादर करण्यात येईल. ज्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे पक्षाकडून वॉर्ड बाबतची रणनीती ठरवण्यात येईल. महत्वाची बाब म्हणजे मनपा निवडणुकीत मनसे हा भाजप सोबत युती करू शकतो,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जर मनसेने युती केलीच तर त्याचा फायदा होईल की तोटा याचा सविस्तर अहवाल देखील या खासगी संस्थेकडून देण्यात येणार आहे.