टीम लय भारी
मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने शाळा (School) सुरू होणार का याबाबत पालकवर्गामध्ये उत्सुकता होती. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीयरीत्या घट झाली आहे. मात्र दिवाळी आणि सणावारांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीची बाब म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
तसेच २३ नोव्हेंबरपासून सुरू होणारे ९ ते १२वीचे वर्गही सुरू न करण्याचे आदेशा पालिका आयुक्तांनी दिले आहे.
शाळा कधी सुरु करायच्या हे स्थानिक अधिकारी ठरवणार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
“बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि करोनाचा प्रादुर्भाव दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता लक्षात घेता ३१ डिसेंबरपर्यंत कोणतीही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहेच, शिवाय मुंबई महापालिकेला तयारीसाठी वेळ मिळावा ही देखील त्यामागील भूमिका आहे. मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शाळा ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचं सॅनिटायझेशन होणं गरजेचं आहे. आता हळूहळू या सेंटरची संख्या कमी केलेली आहे. अजून अनेक शाळांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही. त्यामुळे तेवढा कालावधी मिळणं हे प्रशासनासाठी गरजेचं आहे,” असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
मुंबईसह राज्यातील कोरोनाचे सावट अजूनही कमी झालेले नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.