टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’ नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका क्षेत्रातील आयुक्त गांभीर्याने वागत नाहीत. आपण रात्रं दिवस धावपळ करतो. पण अधिकारी मात्र सुस्तीत वागतात, अशी उद्विग्न भावना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे ( Rajesh Tope upset on Collectors and Commissioners ).
खासगीमध्ये टोपे यांच्याकडून ही भावना वारंवार व्यक्त केली जात असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले. ‘कोरोना’चे आगमन होऊन पाच महिने झाले. तरीही जिल्हा व महापालिका क्षेत्रातील यंत्रणा ‘कोरोना’ निर्मूलनाच्या कामात तरबेज झालेली नाही.
‘कोरोना निर्मूलनासाठी आपल्या जिल्ह्यात किंवा महापालिका क्षेत्रात कसे उत्कृष्ट काम केले जात आहे’ याचे रसभरीत वर्णन सबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त सांगत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात तळागाळात जाऊन पाहतो तर परिस्थिती नेमकी उलटी असल्याचे दिसते, असे टोपे यांचे मत आहे ( Ineffectiveness of collectors and commissioners in Corona pandemic )
अधिकाऱ्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येही टोपे यांनी आपली नाराजी वारंवार व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
राजेश टोपेंचे रात्रभर झाले जागरण, साताऱ्यातील दोन गंभीर घटना निस्तारण्यात गेला वेळ
‘सातारा हॉस्पीटल’वर मंत्रालयातून कारवाईचे आदेश
भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्याला आणि कन्येला कोरोना
‘कोरोना’ निर्मूलनासाठी राज्य सरकारने पथदर्शी निर्णय घेतले आहेत. पण या निर्णयांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी व आयुक्त करीतच नाहीत.
रूग्णांना मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पण तरीही रूग्णवाहिका लोकांकडून पैसे उकळतात. पाच – दहा किलोमीटरसाठी सुद्धा पाच हजारपर्यंत शुल्क आकारले जात आहे. कोणत्याही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी मोफत रूग्णवाहिकेच्या निर्णयाची ठोस अंमलबजावणी केलेली नाही.
खासगी रूग्णालयांनी रूग्णांकडून आकारलेल्या दरांची तपासणी करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पण जिल्हा व महापालिका क्षेत्रात याची अंमलबजावणी होत नाही. अगदी मुंबई – पुण्यामध्ये सुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. अधिकारी खासगी रूग्णालयांवर मेहरबान झाल्यासारखे चित्र असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
अधिकाऱ्यांचे ‘खाण्या’वर लक्ष
‘कॉरन्टाईन’ केलेल्या रूग्णांना नाश्ता व भोजन पुरविणे हा सर्व अधिकाऱ्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. १५० – २०० – ३०० रुपये असे भोजनाचे दर लावून सगळ्या कॉरन्टाईन सेंटरमध्ये मलिदा ओरपण्याचे काम अधिकारी करीत आहेत.
रूग्णांना रूचकर जेवण दिले पाहीजे असे चित्र तयार करून प्रत्यक्षात मात्र स्वतःच मोबदला ओरपण्याकडे अधिकाऱ्यांचे जास्त लक्ष आहे, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
मुंबई, पुणे अशी शहरे ओलांडून ‘कोरोना’ आता गावागावांत घुसला आहे. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी समाज जागृती करण्याकडे लक्षच दिलेच नव्हते. तळागाळात यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी ‘कोरोना’ला आळा घालणे जिकीरीचे बनत चालले असल्याचे या सूत्रांनी सांगितले.