टीम लय भारी
मुंबई : आरोग्य मंत्री राजेश टोपे हे शरद पवार यांच्यासोबत सातारा, सांगली व कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. काल ( शनिवारी ) ते कराड येथे मुक्कामी होते. यावेळी दोन गंभीर घटना घडल्या. त्यामुळे टोपे यांच्यासह त्यांचे खासगी सचिव व विशेष कार्य अधिकाऱ्यांचे रात्रभर जागरण झाले. खुद्द राजेश टोपे यांनीच ‘लय भारी’शी बोलताना ही माहिती दिली ( Rajesh Tope reluctant on Satara Administration).
दरम्यान, ही बातमी टाईप करीत असताना सातारा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांची बदली करीत असल्याचे जाहीर टोपे यांनी जाहीर केले. या बैठकीतच टोपे यांनी डॉ. गडीकर यांची अक्षरशः खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका महिलेला गंभीर स्वरूपाच्या काविळची लागण झाली होती. त्या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेत नव्हते. कृष्णा रूग्णालयातही कुणी दाखल करून घेईनात. मी स्वतः कृष्णा रूग्णालयात फोन केला. डॉक्टर माझा फोन सुद्धा घेत नव्हते. शेवटी मला अधिकाराचा वापर करावा लागला. त्यानंतर या महिलेला दाखल करून घेतल्याचे टोपे म्हणाले.
दुसऱ्या घटनेची माहिती ‘लय भारी’कडून मिळाली होती. पांढरवाडीमध्ये दोन दिवसांपूर्वी महिलेचा मृत्यू झाला होता. पण दोन दिवसानंतर ती ‘कोरोना’बाधित असल्याचे आढळून आले होते. त्याबाबतची खातरजमा करण्यासाठी माझे खासगी सचिव व विशेष कार्य अधिकारी स्थानिक प्रशासनाकडून माहिती मागविण्याचा प्रयत्न करीत होते. पण अधिकाऱ्यांचे फोन लागत नव्हते.
हे सुद्धा वाचा
खळबळजनक : शरद पवार, राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच सातारा प्रशासनाकडून भयानक घोडचूक
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने संताप
रात्री उशिरापर्यंत या दोन्ही घटनांमुळे माझे व माझ्या अधिकाऱ्यांचे जागरण झाले. आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून ते माझे काम आहे. पण साताऱ्यामधील यंत्रणेमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. साताऱ्यातील यंत्रणेमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचे ते म्हणाले.
मी वारंवार सांगत आहे की, यंत्रणेने मिशन मोडवर काम केले पाहीजे. थोडी सुद्धा हलगर्जीपणा चालणार नाही. अशा चुका होता कामा नयेत. ‘कोविड’च्या घटनांमध्ये ट्रेसिंग, ट्रॅकिंग व टेस्टींग या पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. पण पांढरवाडीतील ( माण ) घटना पाहता सातारमध्ये हे होताना दिसत नाही, असे दिसते. त्यामुळे मला आता साताऱ्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असे टोपे म्हणाले.
सातारा रूग्णालयावर कारवाई करणार – अनिरूद्ध आठल्ये
‘लय भारी’चे वृत्त खरे आहे. यात ‘सातारा रूग्णालयाने’ निष्काळजीपणा केला आहे. संबंधित महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी रूग्णालयाने स्वॅब टेस्ट घेतली होती. या टेस्टचा अहवाल येण्यापूर्वीच रूग्णालयाने महिलेचा मृतदेह नातलगांकडे सोपविला होता. रूग्णालयाने ‘कोविड’बाबतचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या रूग्णालयाला नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
‘लय भारी’च्या बातमीनंतर खळबळ
‘लय भारी’ने पांढरवाडीतील घटनेची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सातारा प्रशासन हादरले. दोन दिवस ढिम्म असलेल्या प्रशासनाने तातडीने गावात वैद्यकीय तपासणीसाठी टीम पाठविली. पांढरवाडीतील जाधववाडी या वस्तीवरील गावकऱ्यांचा सर्व्हे करण्यास सुरूवात केली आहे.
तब्बल १४३ लोकांचा सर्व्हे सुरू केला आहे. टेम्परेचर व ऑक्सीजन तपासणी करण्यात येत आहे. औषध फवारणी करण्यात येत आहे. लाऊडस्पीकर व्हॅनद्वारे गावकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.