भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका विरूद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली आहे. रांचीमधील झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. रविवारी झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि ईशान किशन हे मेन इन ब्लूसाठी शोचे स्टार होते. त्यांनी 161 धावांची मोठी भागीदारी केली. श्रेयसने त्याच्या कारकिर्दीतील दुसरे एकदिवसीय शतक झळकावताना 113 धावांची नाबाद खेळी केली तर किशनने केवळ 84 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी केली.
तत्पूर्वी, कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिलसह दोन्ही सलामीवीर पॉवरप्लेमध्ये बाद झाल्याने भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. किशन बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने श्रेयसला भक्कम साथ दिली त्यामुळे यजमानांनी सहजतेने आघाडी घेतली. सॅमसनने 36 चेंडूंत 30 धावांची खेळी करत क्रीजवर नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सामना सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला कारण कर्णधार टेंबा बावुमा आजारपणामुळे खेळू शकला नाही. स्टँड-इन कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक आणि जेनेमन मलान यांनी खराब खेळी केली. परंतु, एडन मार्कराम (79) आणि रीझा हेंड्रिक्स (74) यांच्यातील 129 धावांच्या भागीदारीने पाहुण्यांना मोठ्या धावसंख्येच्या मार्गावर परत आणले.
हे सुद्धा वाचा –
हेन्रिक क्लासेनच्या 26 चेंडूत 30 धावा आणि डेव्हिड मिलरच्या 34 चेंडूत नाबाद 35 धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी मजल मारता आली आणि धावफलकावर 278 धावा केल्या. मोहम्मद सिराजने 10 षटकांच्या स्पेलमध्ये तीन विकेट घेतल्या आणि केवळ 38 धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मंगळवारी तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 11ऑक्टोबर रोजी दिल्लीला खेळवला जाणार आहे.