मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी करून शिवसेनेला आठ महिन्यांपूर्वी अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर सुरु झालेले राजकीय रणकंदन अद्याप शमलेले नाही. त्यांनी भाजपसोबत षडयंत्र रचत सत्ता हस्तगत केली. एकनाथ शिंदे यांनी थेट ‘शिवसेना’ या नावावर आणि पक्षाच्या ‘धनुष्य बाण’ या चिन्हावरच दावा केला. त्यानंतर ही लढाई निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या व्यासपीठावर लढण्यात आली. निवडणूक आयोगाने आठ महिन्यांनंतर बहुमताच्या निकषानुसार ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले आहे. (Eknath Shinde identified ‘sense of responsibility’) शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्हासाठी कायदेशीर मार्गाने हट्ट करणे सोपे असते, पण ते प्राप्त झाल्यानंतर, त्या चार अक्षरी नावात राजकीय इतिहास सामावला आहे, याचे भान आल्यानंतर वास्तवाची जाणीव होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आनंदोत्सव साजरा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या नावामागून आलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. त्या आशयाची भावुक पोस्ट त्यांनी ‘फेसबुक’वर आणि ‘ट्विटर’वर अपलोड केली आहे.
या निर्णयासोबतच येणाऱ्या जबाबदारींचे भान आम्हाला आहे. त्यामुळे विचारांचा हा वारसा जपत आणि ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्रासाठी पुन्हा एकदा सर्वस्व अर्पण करत संघर्ष करण्याची नवीन ऊर्जा आणि बळ आम्हाला मिळाले आहे. pic.twitter.com/PJCyihJ808
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 17, 2023
भारत मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करून एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. विचारांशी काडीमोड घेत असंगाशी संग केलेल्यांसोबत आपण ही लढाई सुरु केली आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. पण त्यासोबत आलेल्या जबाबदारीचे भानही आपल्याला आहे. त्यामुळे विचारांचा हा वारसा जपत आणि ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्रासाठी पुन्हा एकदा सर्वस्व अर्पण करत संघर्ष करण्याची नवीन ऊर्जा आणि बळ आम्हाला मिळाले आहे, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी ‘फेसबुक’वर व्यक्त केली आहे.
शिवसेना म्हणजे झंझावात, त्यासाठी कित्येक मराठी माणसांनी आपल्या आयुष्याची माती करून घेतली. पण त्याची त्यांना ना खंत ना खेद… कित्येकांच्या बलिदानाने शिवसेना या चार अक्षरी नावाला राजकीय वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेना हे केवळ राजकीय पक्षाचे नाव नसून तो एक चार अक्षरी मंत्र आहे. ते नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घेण्याच्या षडयंत्रामागील अदृश्य हात कोणाचा आहे हे तर उघड गुपित आहे. पण समोरचा प्रतिस्पर्धीदेखील गप्प बसणार नाही. तेव्हा एकनाथ शिंदे यांना काटशह देण्यासाठी त्यांच्याकडून कोणता डाव रचला जातो हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईत मराठी माणसांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. आता निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे. शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षासोबत युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, काळासोबत सारेच राजकीय संदर्भ बदलले. आज याच बाळासाब ठाकरे यांच्या शिवसेनेची मुखत्यारी त्यांचे शिलेदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे.
हे सुद्धा वाचा
पंतप्रधानांनी आता जाहीर करावे, लोकशाही नाही बेबंदशाही सुरु आहे : उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा; निवडणूक आयोगाने ‘हे’ मुद्दे घेतले विचारात
मोदींचा मनमानी कारभार : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस