सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म असल्याचे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. त्यामुळे संघाच्या ‘छुप्या अजेंड्याची’ आता उघडपणे अमलबजावणी होत असून सनातींना राजाश्रय प्राप्त झाल्याचे दिसत आहे. योगींच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीक्ष्ण वार केले आहेत. गाई आणि ब्राह्मणांना संरक्षण देणे हेच त्यांच्या सनातन धर्माचे धोरण आहे काय? असा खोचक सवाल त्यांनी आदित्यनाथांना केला आहे. (Jitendra Avhad salms Yogi Adityanath Criticize his statement on Sanatani Dharma)
महिला, अल्पसंख्यांक आणि दलितांवरील अत्याचारांमध्ये उत्तर प्रदेशचा क्रमांक पहिला लागतो, त्या राज्यात अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढत असल्याचे आव्हाड यांनी म्हंटले आहे. या सनातनी विचारांना आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबपर्यंत विरोध करू, असा निर्धार आव्हाड यांनी बोलून दाखवला आहे.
हे सुद्धा वाचा
अग्रलेख : आमदार तुपाशी, जनता उपाशी, महाराष्ट्राची मात्र धुळधाण !
तुकोबारायांबद्दल गरळ ओकणाऱ्या बागेश्वरबाबत गप्पा का? रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना संतप्त सवाल
देशातील दलित, वंचित, अल्पसंख्यांक आणि महिलांच्या सुरक्षेपेक्षा तुम्हाला ब्राह्मणांची सुरक्षा महत्वाची वाटते का? गाई आणि ब्राह्मणांना संरक्षण देणे हाच का तुमचा सनातन धर्म? अशा तिखट शब्दांत आव्हाड यांनी आदित्यनाथांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. सनातन धर्म हा चातुर्वण्य व्यवस्थेचा आधार आहे. या व्यवस्थेला महाराष्ट्राने धुडकावले. या व्यवस्थेला धुडकावणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते, असे आव्हाड म्हणाले. सनातनी व्यवस्थेवर आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत.
सनातनी धर्माला आणि त्यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेला महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी सर्वाधिक विरोध केला आहे, असे ते म्हणाले. या धर्मामध्ये अलुतेदार, बलुतेदार म्हणजेच आजचे बहुजन यांना स्थानच नाही. म्हणजे परत एकदा गावाच्या बाहेर वस्त्या बसतील. आणि परत एकदा अस्पृश्यता जन्माला येईल. यांच्या मनात काय आहे हे आता हळुहळु उघड व्हायला लागलं आहे असा घणाघात आव्हाड यांनी सनातन्यांवर केला आहे.
ब्राह्मणांची सुरक्षा महत्वाची वाटते का?
देशातील दलित, वंचित, अल्पसंख्यांक आणि महिलांच्या सुरक्षेपेक्षा तुम्हाला ब्राह्मणांची सुरक्षा महत्वाची वाटते का? गाई आणि ब्राह्मणांना संरक्षण देणे हाच का तुमचा सनातन धर्म? ज्या सनातनी धर्माला सर्वच संतांनी नाकारलं, ज्या धर्माला शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनीही नाकारलं, नंतरच्या काळात फुले, शाहू, आंबेडकरांनी सनातनी धर्माला फेकून दिलं. तो धर्म पुन्हा भारतावर लादण्याची भाषा आता योगी आदित्यनाथ करीत आहेत.