अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर (Lok Sabha Election 2024 ) वाजला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणूक 19 एप्रिलपासून 7 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जून अशा सात टप्प्यात लोकसभा निवडणुक होणार आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. मागच्यावेळी मे महिन्यातच निकाल लागला होता. यावेळी निकालाला थोडासा उशीर लागणार आहे.
महाराष्ट्रासह 26 जागांवर पोटनिवडणुका होणार. सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेशमध्ये विधनासभा निवडणूक होणार आहे. आंध्र प्रदेश मध्ये १३ मे ला निवडणूक होणार असून अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे १९ एप्रिलला निवडणून पार पडणार आहे.
देशात 97 कोटी मतदार आहेत. 49.7 कोटी पुरूष तर 47.1 कोटी महिला मतदार आहेत. यंदा 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करणार आहेत. महिला मतदारांच प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असून 85 लाख महिला मतदारांचा समावेश आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत.
Chief Election Commissioner Rajiv Kumar announced the dates of the Lok Sabha Elections 2024.
Elections to be held in 7 phases from 19th April to 1st June; Counting of votes on 4th June. pic.twitter.com/kUl6Mv74zP
— ANI (@ANI) March 16, 2024
काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
ही निवडणूक (Lok Sabha Election 2024 ) म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 16 जूनला 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरु आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील.
मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी, शौचालय आणि व्हीलचेअरची सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा करण्यात येणार. 85 वर्षांवरील व्यक्तींसाठी घरी जाऊन मतदान करून घेणार. पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठीही घरोघरी मतदानाची सोय करण्यात येईल.
यंदा महिला मतदारांची संख्या वाढली आहे. 85 लाख नव्या महिला मतदारांची नोंद झाली आहे. देशात 82 लाख मतदार 85 वर्षावरील आहेत. 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. तसेच 1 एप्रिल रोजी ज्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.
तसेच, मतदानाबाबतची कोणतीही माहिती हवी असल्यास ती वेबसाईटवर मिळेल. उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर मिळणार आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या उमेदवारांना त्याची माहिती वृत्तपत्रातून द्यावी लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या साईटवरही गुन्हेगारांची माहिती राहणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यावेळी म्हणाले.
निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. कुठे पैसा वाटप, गैरप्रकार सुरू असेल तर फक्त एक फोटो काढून C विजील ॲप वर टाका, 100 मिनिटांत आमची टीम तिथे पोहोचणार असा विश्वास यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केला.
हिंसामुक्त निवडणुका राबवणं ही आमची जबाबदारी आहे असं सांगत मसल पॉवर, मनी पॉवर रोखण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं. यासोबतच दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार. पैशाचा दुरूपयोग होऊ देणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची नजर राहणार आहे असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.असही मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.
राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मिझोराम, मेघालय, नागालँड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि त्रिपुरा या राज्यांच्या गेल्या 11 विधानसभा निवडणुकांमध्ये सुमारे 3,400 रुपयांच्या रोख चलनावर बंदी घालण्यात आली होती.