लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : काळाचा महिमा अगाध आहे. ज्या भाजपने शिवसेनेचा सातत्याने अपमान केला, त्यांच्याच पाठी पाठी भाजपला फिरावे लागत आहे, आणि ज्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविली त्यांच्याच दारात जाऊन शिवसेना भीक मागत आहे, अशी बोचरी टीका मनसेचे पदाधिकारी संदिप देशपांडे यांनी केली आहे.
देशपांडे यांनी एकाच बाणात भाजप व शिवसेनेवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपवर सतत तोफ डागत आहेत. शिवसेनेवरही त्यांनी सातत्याने हल्ला केला आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांविरोधात राज ठाकरे समान अंतर राखून आहेत. राज ठाकरे यांच्या या धोरणाच्या अनुषंगानेच संदिप देशपांडे यांनी भाजप व शिवसेनेवर टीका केली आहे.
अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत जायला नकार दिला आहे, तर महायुती म्हणून जनतेने भाजप, शिवसेना व मित्रपक्षांना एकत्रित कौल दिला असल्याची भाजपकडून आठवण करून दिली जात आहे. पण शिवसेनेने भाजपच्या या आवाहनाला भीक घातली नाही. शिवसेनेला आता आपला मुख्यमंत्री करायचा आहे. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठींबा घेण्याशिवाय पर्याय नाही. त्या अनुषंगानेच खासदार संजय राऊत आज सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. शरद पवार यांनाही संजय राऊत वारंवार भेटले आहेत. या घडामोडी ध्यानी घेऊन संदिप देशपांडे यांनी भाजप व शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
काळाचा महिमा अगाध आहे ज्या भाजप नी शिवसेनेचा सातत्याने अपमान केला त्यांच्या पाठी पाठी फिरावं लागत आहे आणि ज्या शिवसेने नी राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याच दरवाज्यात जाऊन भीक मागत आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 10, 2019