29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयNitin Gadkari : नितीन गडकरींचा घरचा आहेर !

Nitin Gadkari : नितीन गडकरींचा घरचा आहेर !

नितीन गडकरी हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भाजपच्या मुख्य समितीतून त्यांना डावलण्यात आल्यानंतर गडकरी त्यांचे काय म्हणणे मांडणार म्हणून सुद्धा उत्सुकता वाढली होती, परंतु यावेळी त्यांनी विकासकामांबाबत होणाऱ्या दिरंगाईवर बोलत त्यांनी हा विषयच टाळल्याचे पाहायला मिळाले.  

राजकीय वर्तुळात अगदी आदराने घेतले जाणारे नाव म्हणजेच नितीन गडकरी (Nitin Gadkari). विकासाला नेहमीच अग्रगण्य स्थान देणारे गडकरी देशभरातील लाडके व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जातात.सगळ्याच बाबतीत नेहमीच पुढचा विचार करून देशाच्या विकासाला कायम प्राधान्य देणाऱ्या नितीन गडकरी यांना मात्र भाजपमधून सध्या डावलले जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गडकरी मोदी – शाह यांच्या ‘हो’ ला ‘हो’ मिळवत नसल्याने भाजपने संसदीय समितीतील पत्ताच कट केला. त्यामुळे अनेकांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली, परंतु या सगळ्याच गोष्टींबाबत नितीन गडकरींना यावर काय वाटते हे ऐकण्यास सारेच आतूर झाले असताना गडकरींनी आपल्या पक्षालाच आता घराचा आहेर दिला आहे.

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आज (दि. 21 ऑगस्ट) आयोजित केलेल्या ‘NATCON 2022’ या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना संबोधन करीत विकास कामांबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. नितीन गडकरी म्हणाले, प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं सांगतानाच सरकार वेळेवर निर्णय घेत नाही असे म्हणून त्यांनी भाजपवरच टीकास्त्र सोडले आहे.

हे सुद्धा वाचा…

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

Drowning case : दुर्देवी! राजीवडा मांडवी समुद्रात बोट उलटल्याने पाच जण बुडाले

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

नितीन गडकरी पुढे म्हणाले, बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही. भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल, असे म्हणून बांधकाम क्षेत्राचे महत्त्व त्यांनी विषद केले.

खरं सांगायचं तर आमच्याकडे पैशांचा प्रोब्लम नाही. बँका वाटेल तेवढं कर्ज देण्यास तयार आहेत. प्रश्न आहे मानसिकतेचा. पैसा उभा राहतो. पैशांची अडचण येत नाही. प्रोजेक्ट आखले जातात, मात्र ते वेळेवर पूर्ण होत नाही याची कधी कधी खंत वाटते, म्हणून माझं प्राधान्य हे प्रकल्प आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असतं, असे म्हणून प्रोजेक्ट ताटकळत राहण्यामागचे कारण त्यांनी यावेळी सांगितले.

गडकरी म्हणाले, माझ्या खात्याचं बोलायचं झालं तर भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरु आहेत. अनेकानेक महत्त्वकांक्षी पोजेक्टवर काम सुरु आहे. सध्या टोलमधून वर्षाला 40 हजार कोटी आम्हाला उत्पन्न मिळतं. 2024 पर्यंत हेच उत्पन्न 1 लाख 40 हजार कोटीच्या आसपास असेल, असं सांगताना आता प्रकल्प उभारणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यायला हवं असे म्हणून प्रकल्प उभारणीत वेळेचे असणारे महत्त्व यावर संवाद साधत स्वतःच्याच पक्षाला त्यांनी धारेवर धरले आहेत.

नितीन गडकरी हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भाजपच्या मुख्य समितीतून त्यांना डावलण्यात आल्यानंतर गडकरी त्यांचे काय म्हणणे मांडणार म्हणून सुद्धा उत्सुकता वाढली होती, परंतु यावेळी त्यांनी विकासकामांबाबत होणाऱ्या दिरंगाईवर बोलत त्यांनी हा विषयच टाळल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी