30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयलोकसभेत आंबेडकरांची वेगळी चूल, ४८ जागांवर निवडणूक लढवणार

लोकसभेत आंबेडकरांची वेगळी चूल, ४८ जागांवर निवडणूक लढवणार

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व म्हणजे ४८ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. एवढेच नाही तर प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या घोषणेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. तरीही त्यांनी थेट ४८ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे लोकसभा निवडणुकीला ठाकरे-आंबेडकर हातात हात घालून एकत्र जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचा  निर्णय जाहीर केल्यामुळे भाजपविरोधी इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळणार की नाही, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

सर्व काही जसे आहे जसे घडले तर पुढील वर्षी मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. त्यासाठी सहा महिन्यांपासून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी बहुतांश विरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांच्या इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. आणि आता उमेदवार देण्यासाठी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठका सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सर्व ४८ जागांवर  उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वास्तविक उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे. असे असले तरी वंचित बहुजन आघाडी नव्याने स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ठाकरे आणि आंबेडकर या दोन्ही पक्ष नेत्यांनी घेतलेल्या दोस्तीच्या आणाभाकांचे काय होणार, हा प्रश्न आहेच. या दोन्ही पक्षांची युती असली तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी युतीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कोणत्या जागा मिळणार, शिवसेना कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार, याबाबत काहीही स्पष्टता आलेली नव्हती.

हे ही वाचा

नितीश कुमारांचे आता महाराष्ट्रात लक्ष्य; JDU चा मुंबईत संवाद मेळावा

ओबीसींसाठी 4 हजार कोटींच्या योजना; वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाचा निर्णय़ : देवेंद्र फडणवीस

कोणते पत्रकार ढाब्यावर जाण्यासाठी, चहासाठी भुकेले आहेत? शरद पवारांनी उपटले बावनकुळे यांचे कान

आता वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागली असून लवकर प्रकाश आंबेडकर राज्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे ‘वंचित’च्या उमेदवारांची लवकर घोषणा झाल्यास आश्चर्य वाटू नये. तरीही ‘इंडिया’ आघाडीत जाण्याची वेळ आली तर प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या किती जागा मागतील आणि केवळ ठाकरे गटासोबत त्यांची युती कायम राहिली तर प्रकाश आंबेडकरांच्या काय अपेक्षा असतील, या बाबीही अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी