पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची ५६ इंचाची छाती याबाबत त्यांच्या अंधभक्तांनी आणि भाजपच्या ‘मीडिया सेल’ने समाजमाध्यमांमध्ये हवेचे बुडबुडे तयार केले आहेत. ज्येष्ठ कवी, गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी पाकड्यांना त्यांच्या भूमीवर खडे बोल सुनावले. ५६ इंचाची छाती काय असते ते मोदींच्या नावाचा जप करणाऱ्या भक्तांनी त्यांच्याकडून शिकावे. संघ परिवाराने आणि भारतीय जनता पक्षातील एखाद्याने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे हिम्मत दाखवावी, असे आव्हान उद्धव ठाकरे गटाने ‘सामना’मधून केले आहे. (You should Learn patriotism from Javed Aakhtar)
शायर फैझ अहमद फैझ यांच्या लाहोरमधील स्मृती समारोहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान जावेद अख्तर यांनी लाहोरवर पुन्हा एकदा तिरंगा फडकावला आहे. पाकिस्तान जाऊन त्यांनी यजमानांना खडे बोल सुनावले. पाकिस्तान जाऊन असे ‘खाडकन’ वाजवून बोलणे सोपे नाही. अशा शब्दांत ठाकरे गटाने अख्तर यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून ‘घुसके मरेंगे’ अशा गर्जना होत असतात, पण शत्रूच्या गुहेत शिरून “तुम्हीच आमच्या देशाचे हल्लेखोर आहेत. सहन कसे करायचे?” असे तोंडावर बोलणारच सच्चा देशभक्त असतो, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
भाजप आणि संघ परिवाराच्या देशभक्तीच्या संकल्पनेवरही ‘सामना’मध्ये हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवाद आणि देशद्रोहाची व्याख्या वेगळी आहे. जे त्यांच्या पालख्या उचलत नाहीत व जे त्यांचे गुलाम बनायला तयार नाहीत, ते सर्व त्यांच्या दृष्टीने देशद्रोही ठरतात. जे मोदीभक्त नाहीत ते देशाचे नाहीत, असे त्यांचे सरळ मत आहे.
- निवडणूक जिकंण्यासाठी हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान असे बखेडे उभे करायचे. गोवंश रक्षणाच्या नावाखाली निरपराध मुस्लिम तरुणांना जाळायचे. पण भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे नेते, मंत्री “आम्ही गोमांस भक्षक आहोत,” असे जाहीरपणे बोलत असतात, त्यांच्यावर डोळे वाटारायची हिम्मत नाही.
- पाकिस्तान देशाचा शत्रू आहे तसा चीनही आहे, पण मोदी फक्त पाकिस्तानला दम भरतात व चीनचे नाव घ्यायला घाबरतात ही वस्तुस्थिती आहे. काही चिनी ‘अँप्स’ वैगेरेंवर बंदी घातली की, मोदी सरकारचे चीनविरुद्धचे ‘धाडस’ संपते.